सातारा (प्रतिनिधी) – पुसेसावळी (ता. खटाव) येथील कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चूकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. 10) इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका समूहाच्या दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेच्या अनुषंगाने औंध पोलीस ठाणे येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून आक्षेपार्ह मजकुराच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर, औंध पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदर घटनेतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे करीत आहेत. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे फुलारी यांनी सांगितले.