Mumbai Air Pollution – देशाची राजधानी नवी दिल्लीसह मुुंबईतही हवेची गुणवत्ता (Mumbai Air Pollution) खालावली असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) तीव्र शब्दांत फटकारले.
विकासकामांपेक्षा नागरिकांचे जीव महत्त्वाचे असून काही दिवस बांधकामे बंद राहिल्यास आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल न्यायालयाने केला. तसेच मुंबई महापालिकेने विनंती केल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
चार दिवसांत हवेची गुणवत्ता चांगली न झाल्यास बांधकामावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही हायकोर्टाने म्हटले. बांधकाम बंदीबाबत प्रशासनाला हायकोर्टाकडून अखेरची संधी देण्यात आली असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
येत्या शुक्रवारपर्यंत हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा न झाल्यास दिवाळीचे चार दिवस बंदी लागू करणार असल्याचे हायकोर्टाने म्हटले. बांधकामातील डेब्रिज वाहून नेणारी वाहने ताडपत्रीने पूर्णपणे झाकणे बंधनकारक असून फटाक्यांवर बंदी घालण्याची इच्छा नाही.
न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांच काटेकोर पालन करा, असेही हायकोर्टाने सांगितले. मुंबई महापालिका आणि पोलिसांनी हे सुनिश्चित करावे की फटाके फोडण्याबाबत कोर्टाच्या नियमांचे पालन केले जाते की नाही.
आवाज करणारे फटाके रात्री 7 ते 10 या वेळेतेच वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वेळेबाबत निर्धारित करून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.