कराड -करोना महामारीचे संकट अजून संपलेले नाही आणि सणासुदीच्या काळात महामारीचा संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आरोग्य विभागासह प्रशासनाने व्यक्त केला आहे. संकट डोक्यावर घोंगावत असतानाही कराड शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत तोबा गर्दी करताना दिसत आहेत.
करोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. असे असतानाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारपेठ गजबजून गेली आहे. प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करुनही बहुतांश नागरिकांकडून नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना करोनाचा विसर पडला आहे की का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिवाळी सणाला आज वसू बारशीने प्रारंभ झाला. त्यामुळे लक्ष्मीपूजन व दिपावली पाडवा व भाऊबीजच्या खरेदीसाठी शहरात नागरिकांची झुंबड उडाली आहे. विविध रंगी आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाईच्या दुकानांसह खाद्यपदार्थ, कपडे, दागिन्यांची दुकाने सजली आहे. या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे.
बाजारपेठेत यंदा चायनीज वस्तूऐवजी भारतीय वस्तूंची रेलचेल दिसून येत आहे. तसेच दिवाळी खरेदीच्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. अशातही खरेदीसाठी दाखल झालेल्या नागरिकांकडून मास्क, सॅनिटायझर वापर होताना दिसत नाही. अनेक नागरिक खरेदीसाठी निष्काळीपणे घराबाहेर पडत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांनी बाजारपेठेत उलाढाल सुरू झाल्याने व्यापारी वर्गामध्येही समाधानाचे वातावरण आहे. नेहमीप्रमाणेच अनेकांनी दिवाळीचे साहित्य घेऊन रस्त्याच्या कडेला ठाण मांडले आहे. त्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली आहे. फेरीवाल्यांकडून विविध वस्तू खरेदीसाठी व कपड्यांच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी उडाल्याचे चित्र आहे. दिवाळीवर करोनाचे सावट असले तरी नागरिकांमध्ये दिवाळीचा उत्साह कायम असल्याचे दिसून येत आहे.
शहारातील मुख्य बाजारपेठेतसह चावडी चौक, शिवाजी क्लॉथ मार्केट, मंगळवारपेठ परिसर नागरिकांच्या गर्दीने फुलला आहे. दरम्यान, एकीकडे प्रशासनाकडून करोना नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु असल्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दिवाळीनिमित्त पाणीपुरवठा वेळेत बदल..
कराड नगरपालिकेकडून दिवाळीच्या काळात शहरात पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात आला आहे. पाणी पुरवठा विभागातर्फे त्याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सकाळी होणाऱ्या पाणीपुरवठा वेळेत हा बदल करण्यात आला आहे. शनिवार, दि. 14 पासून ते सोमवार, दि. 16 पर्यंत पाणीपुरवठा वेळेतील बदल लागू राहणार आहे. सूर्यवंशी मळा, मार्केट यार्ड व गजानन हाऊसिंग सोसायटीमधील टाकीद्वारे होणारा पाणीपुरवठा नेहमीच्याच वेळेत होईल. सोमवारपेठ पाण्याच्या टाकीतून सकाळी 5.30 ते 6.30 यावेळेत यावेळेत पाणीपुरवठा होईल. रुक्मिणीनगर पाण्याच्या टाकीद्वारे सकाळी 6 ते 7 या वेळेत तसेच रविवारपेठ पाण्याची टाकी व यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन पाण्याची टाकीद्वारे सकाळी 6 ते 7 यावेळेत पाणीपुरवठा होईल.सुर्यवंशी मळा, मार्केट यार्ड व गजानन हाउसिंग सोसायटीद्वारे शनिवार ते सोमवार या दरम्यान केवळ सकाळच्या पाणीपुरवठा वेळेत बदल केला आहे. मंगळवार, दि. 17 नोव्हेंबरपासून शहरातील सर्व टाक्याद्वारे नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल, असे पालिकेकडून स्पष्ट केले आहे.