उन्हाळ्याची चाहूल लागली की, ग्रामीण भागात गरीबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या रांजण व डेऱ्यास मोठी मागणी असायची. यासाठी कुंभार व्यावसायीक चार महिने अगोदर पासूनच उत्पादन सुरू करत होते. त्यासाठी लागणारी माती, शेणी, पाणी याची सोय करून रांजणासह लहान मोठे डेरे तयार केले जातात. त्यास आव्यामध्ये भाजून चांगल्या प्रतीचे रांजण, डेरे बाजारात विक्रीसाठी येतात. मात्र आधुनिकतेच्या गर्तेत सद्याच्या फ्रीजचे आकर्षण गोरगरीबांनाही झाले आहे. ग्रामीण भागातील सामान्य कुटूंबातही फ्रीजचा वापर वाढू लागला आहे. फ्रीजच्या वाढत्या वापरामुळे उन्हाळ्यातील रांजण व डेरे विक्रीवर परिणाम झाल्याचे कुंभार व्यवसायिक सांगत आहेत.
लग्न मंडपात बवले सजवताना लाकडी माचा किंवा कॉटला लहान डेरे बांधण्याची पध्दत आता बंद झाली आहे. याशिवाय कडधान्याची काढणी सुरू झाली की, ग्रामीण भागात कडधान्ये भरून ठेवण्यासाठी सर्रास डेऱ्यांचा वापर होत असे. घरोघरी घराच्या कोपऱ्यात या उतरंडी लावल्या जात असत. मात्र, प्लास्टिक बरण्या, पत्र्याचे डबे यांचा वापर वाढल्याने डेरे खरेदीसाठी कोणीही कुंभारवाड्याकडे फिरकत नाही.
ग्रामीण भागात स्वयंपाक करण्यासाठी पूर्वीपासून कुंभारी चूलींना मोठ्या प्रमाणात मागणी असायची. साधी चूल, वैयलाची चूली घरोघरी दिसत होत्या. परंतु, आता ग्रामीण भागातही घरोघरी गॅस, गिजरच्या वापरातुळे चूलीही इतिहास जमा झाल्या आहेत. त्यामुळे चूलीवरचा रस्सा, चूलीवरची खमंग भाकरी आता धब्यावर शोधण्याची वेळ आली आहे. आता फक्त संक्रातीचा कार्यक्रम बेंदराची बैल, नागोबा आदींसाठी काही प्रमाणात लोकांना कुंभारांची आठवण येते असे म्हंटलेतर वावगे ठरणार नाही.
एकविसाव्या शतकाच्या उंबरट्यावर मानवाने विज्ञानाच्या सह्याने प्रत्येक क्षेत्रात थक्क करणारी प्रगती केली असताना नवनवीन वस्तूंची निर्मीती होत आहे. नवीन वस्तू वापरत असताना मात्र संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. जुन्या रूढी-पंरपरांचा सर्वांनाच विसर पडत चालल्याने ग्रामीण भागातील माती काम करून सुबक, आकर्षक आणि पर्यावरणपूरक मातीच्या वस्तू बनवणाऱ्या कारांगीरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही पारंपारिक कला व या व्यवसायाशी संबंधित कारागींराना मायबाप सरकारने आर्थिक साह्य करावे, अशी मागणी कुंभार समाज बांधवातून होत आहे.
“फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’या अभंगाच्या ओळी कानावर पडताच कुंभार व्यावसायीक डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. पण सद्याच्या फ्रीज, गॅसच्या जमान्यात मातीचे रांजण, डेरे व चुली तसेच अनेक पारंपारिक मातीच्या वस्तू इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कुंभार व्यवसाय आणि कारागीर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. करोना महामारीच्या संकटात तर गणपती नवरात्रीचा हंगामही वाया गेला. उत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या मूर्ती तशाच सांधवडीला ठेवण्याची वेळी कुंभारांवर लागल्याने कुंभार व्यावसायिकाचे कंबरडे मोडले असून तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
– आनंदराव देसाई