नगर – ड्रेनेजलाईनची व्यवस्था आहे, मात्र ड्रेनेजचे पाणी वाहुन जाण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांच्या घरांच्या परिसरातच ड्रेनेजचे पाणी साचुन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भावही वाढला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील दौंड रस्त्यावरील विद्यानगर, हनुमाननगर, कोर्टकॉलनी, आय.पी.कॉलनी, शितल कॉलनी, वॉचमन चाळ या परिसरात ही ड्रेनेजच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या परिसरात ड्रेनेजलाईनची व्यवस्था आहे. मात्र या परिसरातील ड्रेनेजचे पाणी बुरुडगाव नाल्यामध्ये सोडण्यात आले होते होते. या उघड्या नाल्यात ड्रेनेजेचे पाणी सोडण्यास परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला. तसेच ज्या ठिकाणी पाणी सोडले होते. तेथे ते बंद करण्यात आले. परिणामी ड्रेनेजचे पाणी या कॉलन्यांच्या परिसरातच साचत आहे.या घाण पाण्याची प्रचंड दुर्गंधी परिसरात पसरली आहे. घाण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांना विविध साथीच्या आजारांचा सामना करावा लागत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हा परिसर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके यांच्या प्रभागात येत असल्याने नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर सभापती शेळके यांनी तातडीने अधिकाऱ्यांना याबाबत पाहणी करुन उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. या पार्श्वभुमीवर उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, अभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी या परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सुरज शेळके यांच्यासह परिसरातील नागरिकांनी होत असलेल्या त्रासाबाबत उपायुक्त पठारे यांना माहिती दिली.