– आशिष निनगुरकर
सध्याचे राजकारण पाहून कधी काय होईल याचा नेमका ताळेबंद आखता येत नाही. राजकारण, बॉलीवूड व इतर प्रादेक्षिक भाषिक चित्रपटांतून दाखविण्यात आलं आहे. त्यावर टाकलेला दृष्टिक्षेप…
देशातील राजकीय, आर्थिक घडामोडींवर अभ्यासपूर्ण सिनेभाष्य करण्यासाठी प्रकाश झा ओळखले जातात. प्रकाश झा यांच्या चित्रपटांतून भारतीय राजकारणातील व्यक्तिरेखा थेट पडद्यावर आल्या होत्या. भारतीय राजकारणातील अनेक बाबी त्यांनी चित्रपटांतून मांडल्या होत्याच. अर्थात, तरीही त्यांच्या चित्रपटांत थेट कोणतीही भूमिका घेण्याचे सोयीस्करपणे टाळले होते. एकीकडे दक्षिणेकडचे भडक राजकारणावरील अतिरंजित चित्रपट; तर दुसरीकडे उत्तरेकडचे हिंसात्मक राजकारण आपल्याकडे रंगविले गेले. राजकारणावर आधारित चित्रपट बघायला अनेकांना आवडते.
“किस्सा कुर्सी का’ हा चित्रपट 1978 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेता राज बब्बर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 2010 मध्ये “राजनीती’ या चित्रपटाची निर्मिती झाली होती. या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, कतरिना कैफ यांसारखी स्टारकास्ट मंडळी झळकली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रकाश झा यांनी घेतली होती. “राजनीती’ हा दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा आतापर्यंतचा सगळ्यात हिट चित्रपट समजला जातो. दिग्दर्शक प्रकाश झा यांचा सामाजिक नाट्यावर आधारित “सत्याग्रह’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला होता. या चित्रपटात बॉलीवूड शहेनशाह अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि करिना कपूर हे मुख्य भूमिकेत झळकले असून त्यांच्यासोबत अर्जुन रामपाल, मनोज वाजपेयी, अमृता राव यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती यूटीव्ही मोशन आणि झा यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आली.
अण्णा हजारे यांनी केलेल्या उपोषणावर आधारित या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती के. सी. बोकाडिया यांनी केली असून हा राजकीय ड्रामा प्रकारात मोडणारा चित्रपट आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या “डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटात अभिनेत्री मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत झळकली आहे. तिच्यासोबतच ओमपुरी आणि नसिरुद्दीन शहा यांसारखे नावाजलेल्या कलाकारांनीही स्क्रीन शेअर केली आहे. राजस्थानमधील भवरीदेवीच्या घटनेवरून प्रेरणा घेऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. राजस्थानमधील एका शक्तिशाली नेत्याद्वारे भवरीदेवीची हत्या करण्यात आली होती. या चित्रपटात मल्लिकाने भवरीदेवीची भूमिका साकारली होती. 2009 साली अनुराग कश्यप यांनी “गुलाल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात राजसिंह चौधरी, दीपक डोबरियाल यासारखी स्टारकास्ट मंडळी झळकली आहे. अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेला “नायक : द रियल हिरो’ हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्याकाळी ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटामध्ये राजकारण, समाजातील उदासीनता आणि भ्रष्टाचार यावर भाष्य करण्यात आलं.
1 जुलै 2005 रोजी “सरकार’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून पराग संघवी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या पिता-पुत्राच्या जोडीने एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. त्यांच्यासोबतच कतरिना कैफ, तनीशा, अनुपम खेर, सुप्रिया पाठक हे सहकलाकारही झळकले आहेत. चित्रपट दिग्दर्शिका नंदिता दास यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला “फिराक’ हा पहिला चित्रपट आहे. गोध्रा हत्याकांडाच्या एका महिन्यानंतर सामान्य लोकांवर त्याचा काय परिणाम झाला, याचे दर्शन या चित्रपटातून दाखविण्यात आलं. अभिनेता नसीरुद्दीन शहा, दीप्ती नवल, नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल, संजय सुरी, रघुवीर यादव, शहाना गोस्वामी यांनी या चित्रपटात भूमिका केल्या. 2010 मध्ये रिलीज झालेला “पीपली लाइव्ह’ या चित्रपटामध्ये कॉमेडीच्या माध्यमातून मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
“आँधी’ ही राजकीय पार्श्वभूमीवरील गुलजार यांच्या शैलीतून साकारलेली भावपूर्ण अशी प्रेमकथाच होती. “अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, “सत्ता’, “उरी-द सर्जिकल स्ट्राइक’, “पीएम मोदी’, “द आयर्न लेडी’, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावरचा “द ताश्कंद फाइल्स’, “द केरला स्टोरी’ हे चित्रपट व “सिटी ऑफ ड्रिम्स’ ही वेबसिरीज प्रेक्षकांना प्रचंड भावली. यासारख्या अनेक चित्रपटांनी रुपेरी पडदा व्यापला.
प्रादेशिक भाषेतही अनेक प्रचारकी चित्रपट येऊन गेले आहेत. यात मराठीत “गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ हा दोन भागात, “सिंहासन’, “सामना’, “खुर्चीसम्राट’, “विजय असो’, “झेंडा’, “मोरया’ तसेच “ठाकरे’, “धर्मवीर’ त्याचबरोबर दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एनटी रामाराव यांच्या जीवनावर दोन भागात “एनटी आर नाथानायूकुडू’ आणि “लक्ष्मीज एनटी आर’, वायएसआर रेड्डी यांच्या जीवनावरील “यात्रा’, जयललितांच्या जीवनावरचा कंगनाचा “थलायवी’ असे चित्रपट येऊन गेले आहेत. सुधीर मिश्रा यांनी “हजारो ख्वायिशे’ तयार केला, ज्यामध्ये राजकारण हे दिसून आले. मणिरत्नम यांनी “रोझा’ चित्रपटात त्यावेळचा काश्मीरचा प्रश्न हाताळला होता. शशी कपूरचा “न्यू दिल्ली टाइम्स’ हा चित्रपट तत्कालीन राजकारणावर आधारित होता. मणिरत्नम यांनी पुढे “बॉम्बे’मध्येदेखील धार्मिक संघर्ष दाखवला होता. “दिलसे’चे देखील कथानक हे याचप्रकारच्या राजकारणावर आधारित होते. व्यावसायिक चित्रपटात “रंग दे बसंती,’ “ब्लॅक फ्रायडे’ व “चक्रव्यूह’ अशा चित्रपटांची नावेसुद्धा आपण घेऊ शकतो. येणाऱ्या काळात अनेक राजकीय चित्रपटांची भर पडणार आहे. त्यामुळे राजकारण व चित्रपट यांचा खूप जवळचा संबध राहिला आहे व यापुढेही राहील असेच दिसते.