आज संध्याकाळचं जेवण झाल्यावर बाळू, शमी बाबांजवळ आले. बाबा कुठलंसं पुस्तक वाचत बिछान्यावर बसले होते. बाळू लगेच बाबांना म्हणाला, “बाबा, किती दिवस झाले, तुम्ही आम्हाला गोष्टच सांगितली नाही. एखादी नवीन गोष्ट सांगा ना?’ शमीनेसुद्धा लगेच री ओढली, “हो बाबा, सांगा ना एखादी नवी गोष्ट. प्लीज..!’ बाबा म्हणाले, बरं… सांगतो… सांगतो. मुलांनो, आज ना, मी तुम्हाला लक्ष्मण नावाच्या मुलाची बालपणातीलच गोष्ट सांगतो.
अंदाजे तीस चाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. तेव्हा लक्ष्मण नववीच्या वर्गात शिकत होता. शाळा आणि घर यातलं अंतर तसं मोठंच होतं. शाळेची वेळ सकाळची सातची. शाळेत तो सकाळी पायीच झपझप चालत येत असे. पण दुपारी शाळेतून घरी जाताना मात्र बसने एक आणा देऊन तो घरी येई. कारण भर दुपारची उन्हं, तापलेले डांबरी रस्ते, वाहतुकीची गर्दी आणि त्यात तो अनवाणी. म्हणून वडील त्यांना शाळेत जाताना रोज एक आणा बससाठी देत. खरंतर, हा छोटा लक्ष्मण अभ्यासात अतिशय हुशार होता बरं. परिस्थितीची जाणीवही होती त्याला. त्यामुळेच शाळेत येण्यापूर्वी वाटेतच लागणाऱ्या एक बिल्डिंगच्या खाली उभ्या असणाऱ्या दोन मोटारगाड्या धुऊन-पुसून तो शाळेत येत होता. या कामातून मिळणारे पैसे तो वडिलांच्या हातावर ठेवत असे.
एकदा त्याच्या शाळेत नवे मुख्याध्यापक रुजू झाले. अतिशय कडक शिस्तीचे. सकाळी सातला मुले प्रार्थनेला हजर असलीच पाहिजेत, असा त्यांचा दंडक. मुलं गबाळ्यासारखी आलेली, उशिरा उपस्थित राहिलेली, अर्धवट गृहपाठ करणारी त्यांना अजिबात आवडत नसे. अन् या शाळेत तर बरीच मुलं अनेकदा शाळेत उशिरा हजर होत. मग यावर मुख्याध्यापकांनी एक तोडगा काढला. जो विद्यार्थी प्रार्थनेला उपस्थित नसेल, शाळेत उशिरा येईल त्याच्याकडून दोन आणे दंड वसूल केला जाईल, अशी सूचनाच त्यांनी काढली. यातून एक गोष्ट चांगली झाली. मुलांचं उशिरा येण्याचं प्रमाण हळूहळू कमी झालं. अगदी शून्यापर्यंत आलं. आता कधीतरी क्वचितच एखादा मुलगा अचानक उद्भवलेल्या काही अडचणीमुळे उशिरा येई आणि मग दोन आणे दंड कार्यालयात जमा करी.
एकदा नेहमीप्रमाणेच तो भल्या पहाटे गाडी पुसण्याच्या कामाकडे निघाला. पण त्यादिवशी त्याला पुसायच्या गाडीच्या बाजूला इतर गाड्या पार्क केल्यामुळे त्याला नीट काम करताच येईना. मग तिथल्या वॉचमनला उठवून त्याने आपली अडचण त्याला सांगितली. पण त्यातून मार्ग काढायचा म्हणजे या पार्क केलेल्या इतर गाड्या बाजूला काढल्या गेल्या पाहिजेत. अन् एवढ्या पहाटे हे कसं शक्य आहे? त्याने त्या अडचणीतच मग कशातरी गाड्या पुसून काढल्या मात्र यामध्ये त्याचा भरपूर वेळ गेला अन् याचा परिणाम शाळेत तो उशिरा पोहचला. “आनंदकंद ऐसा, हा हिंद देश माझा’ हे देशभक्तीपर समूहगीत जवळजवळ संपतच आले होते. अन् लक्ष्मणनं शाळेत पाऊल टाकलं. मुख्याध्यापक लक्ष्मणला म्हणाले, उशीर झाला ना? दोन आणे दंड कार्यालयात भरायचा. लक्ष्मणने खालच्या मानेनेच होकार दिला.
लक्ष्मणने मनाचा निश्चय केला. दोन दिवस शाळा सुटल्यावर पायीच चालत दुपारी घरी जायचं अन् मग बसचे वाचवलेले दोन दिवसाचे दोन आणे, दंड म्हणून शाळेत भरून टाकायचे. आज शाळा सुटल्यावर लक्ष्मण घराकडे पायीच निघाला. दुपारची वेळ, डांबरी रस्ते, त्यात लक्ष्मणच्या पायात चप्पल नव्हती. अशावेळी लक्ष्मण सावलीचा आडोसा रस्त्याच्या कडेला शोधे. धावत जाऊन तिथं थांबे. पुन्हा पुढची सावलीची जागा पाहून धावत जाऊन पुन्हा तिथं थांबे. उन्हाचे चटके सावलीत थांबल्यावर कमी बसत. पोळलेल्या पायांना सावलीत आराम मिळे. असे करत करत तो घर गाठे. दोन दिवस तो अशा प्रकारे कसरत करीत घरी गेला आणि एकदाचा दंड भरून टाकला. त्याने मग कानाला खडा लावला. यापुढे कधीच शाळेत उशिरा जायचं नाही.
ही घटना घडल्यानंतर चारच दिवसांनी मराठीच्या बाईंनी नववीच्या वर्गाला अनुभवकथन हा भाग शिकवून, याच विषयावर मुलांना एक उपक्रम दिला. त्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यातील कोणताही एखादा अनुभव, प्रसंग सुमारे दोनशे शब्दांत शब्दबद्ध करायला सांगितला. या उपक्रमामुळे मुलांना मुक्तपणे लेखन करायची संधी मिळणार होती आणि उत्कृष्ट अनुभवलेखनाला आकर्षक बक्षीसही मिळणार होते. लक्ष्मणने अनुभवकथन लिहिले. त्याच्या अनुभव कथनाचे शीर्षक होते…” दोन आणे दंड’.
बाईंनी लक्ष्मणचा अनुभव वाचला. त्या एकदम अवाक झाल्या. मनाला चटका लावणाराच तो अनुभव होता. बाईंनी मग तो अनुभव सगळ्या शाळेला वाचायला मिळावा म्हणून शाळेच्या दर्शनी काचफलकातच लावला. साहजिकच शाळेचे मुख्याध्यापक यांच्या तो वाचण्यात आला. लक्ष्मणचे अनुभवकथन त्यांनी वाचल्याबरोबर लगेच लक्ष्मणला केबिनमध्ये बोलावून घेतले. लक्ष्मण भीतभीतच केबिनमध्ये आला.
मुख्याध्यापक म्हणाले, आधीच हे सारं सांगायचं नाही का रे मला. कशाला एवढा स्वत:ला त्रास करून घेऊन दंड भरलास? लक्ष्मण गप्प उभा. काहीच बोलला नाही. एकवार सरांकडे फक्त त्याने पाहिले. त्याचे डोळे काहीच न बोलता बरंच काही बोलून गेले. मग मुख्याध्यापकांनी जुनी सूचना रद्द करून आता नवीन सूचना काढली. उद्यापासून शाळेत उशिरा येणाऱ्या कुणाकडूनही दंड वसूल केला जाणार नाही. पण उशिरा येणाऱ्याला श्रमदानातून आपलं खेळाचं मैदान अधिक चांगलं करण्यासाठी एक जादा तास शाळेसाठी द्यावा लागेल. मुलांनी गोष्ट संपल्याबरोबर टाळ्या वाजवल्या. या टाळ्या बाबांनी सांगितलेल्या गोष्टीसाठी होत्या आणि गोष्टीतल्या छोट्या लक्ष्मणसाठीही.
एकनाथ आव्हाड