– सोनम परब
उत्तराखंडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांनी समाजाची अचूक नाळ ओळखली आहे. म्हणूनच सुनपट आणि पाताल-ती या दोन उत्तराखंडच्या चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक झाले.
भारतीय चित्रपटसृष्टीला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. राष्ट्रीय भाषेबरोबरच प्रादेशिक भाषेतही शेकडो चित्रपटांची निर्मिती होते. ईशान्य भारतापासून दक्षिण भारतापर्यंत असंख्य चित्रपट तयार होतात आणि ते आपापल्या प्रांताचे, भागाचे प्रतिनिधित्व करतात. संस्कृती, परंपरा, वारसा याबरोबरच स्थानिक समस्यांही मोठ्या पडद्यावर मांडतात. याच श्रेणीत उत्तराखंडच्या चित्रपटनगरीचाही इथे उल्लेख करता येईल. पर्यटनाने समृद्ध असलेल्या या राज्यात तयार होणाऱ्या चित्रपटांचा दर्जा हा दक्षिणेतील चित्रपटांप्रमाणे नसला तरी समाजाची अचूक नाळ ओळखण्याचे कसब स्थानिक तरुण निर्मात्यांना आहे. म्हणूनच सुनपट आणि पाताल-ती या दोन उत्तराखंडच्या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक झाले.
साधारणपणे आतापर्यंत उत्तराखंडच्या चित्रपटांत पर्वतीय समाजरचना, सांस्कृतिक वारसा या आघाडीवर वाटचाल होत असताना विस्मृतीत जाणाऱ्या काही घटकांवर लक्ष केंद्रित राहिलेले आहे. विशेषत: राज्याबाहेर राहणाऱ्या लाखो उत्तराखंडच्या नागरिकांच्या भावना, आशा-आकांक्षा मांडण्याचे काम चित्रपटांनी केले. या कथानकात वास्तववादी गोष्टी प्रकर्षाने दिसून आल्या. विशेषत: गेल्या काही वर्षांत राज्याच्या निमार्त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळत आहे.
यंदा प्रथमच दीर्घकाळाचे चित्रपट सुनपट आणि पाताल-ती यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित पॅनोरमा पुरस्काराने गौरविण्यात आले. सुनपट या शब्दाचा अर्थ सुनसान किंवा निर्जन ठिकाण. त्याचवेळी पाताल-तीचा अर्थ काळजीपूर्वक पाहिला तर चीन सीमेलगत असलेल्या आदिवासी समुदायात त्यास पाणी असे म्हटले जाते. म्हणजेच दुर्मीळ होणारे गोड पाणी. या चित्रपटाचे प्रदर्शन फ्रान्स, रशिया आदी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाले आहे.
अर्थात, या चित्रपटांच्या यशाने उत्तराखंड चित्रपटांना पाठबळ मिळाले असून नव्या निर्मात्यांना देखील काहीतरी नवीन प्रयोग करण्याबाबत प्रेरणा मिळाली.तत्कालीन प्रश्न आणि भावनात्मक पैलू दोन्ही चित्रपटांत उत्तराखंड समाजातील तत्कालीन प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सुनपट चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे राहुल रावत म्हणतात, की चित्रपटाचे कथानक राज्यातून होणाऱ्या पलायनासारख्या गंभीर प्रश्नांचा ऊहापोह करते. त्याचवेळी या प्रश्नाकडे भावनात्मक बाजूने पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
बराच काळ परराज्यात, परदेशात राहून स्वगृही येणारा उत्तराखंडचा मूळ नागरिक हा आपल्या गावी आल्यानंतर स्थानिक बदलाचा कसा अनुभव घेतो, याकडे लक्ष वेधले आहे. दोन्ही चित्रपटांची शूटिंग उत्तराखंडच्या दुर्गम भागात झाली आहे. चित्रपटात काम करणारे सर्वच कलाकार स्थानिक लोक आहेत. त्यांच्या अभिनयाने विविध चित्रपट महोत्सवातील समीक्षकांना देखील आश्चर्यचकित केले आहे. गतवर्षी दिल्लीत पहिल्या सार्वजनिक स्क्रिनिंगच्या वेळी लोकांनी “स्टॅडिंग ओव्हेशन’ देत चित्रपटाचे कौतुक केले.
मुळाशी जोडण्याचा प्रयत्न
कामाच्या निमित्ताने राज्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. राहुल रावत म्हणतात, की या चित्रपटाच्या माध्यमातून निर्वासित नागरिक हे पुन्हा मूळ परंपरा, गावांशी जोडले जातील आणि स्थलांतरित झाल्यामुळे विस्मरण झालेल्या समाजाच्या भावना समजून घेतील, अशी आशा आहे. प्रत्यक्षात हे चित्रपट भौगोलिक आणि भावनात्मक पातळीवर पडलेले अंतर दाखवते आणि स्थलांतरित नागरिकांत आपलेपणाची भावना जागृत करण्याचे काम करते. या कथानकात लोकांतील अभिमान, संस्कृती रक्षक आणि सामाजिक संवादाच्या भावनांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.
पर्यटनाशिवाय मोठा वारसा
आपल्या खिशातून पैसा खर्च करत चित्रपट तयार करणारे हे तरुण निर्माते आणि दिग्दर्शक यांचा मोठा संघर्ष राहिला आहे. या चित्रपटांच्या दिग्दर्शकांच्या मते, आमचे ध्येय उत्तराखंडकडे जगभराचे लक्ष वेधून घेण्याचे आहे. उत्तराखंड हे लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्याने निसर्गसंपन्नता भरपूर आहे. पाताल-तीचे दिग्दर्शक संतोष रावत म्हणतात, की या चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही प्रादेशिक संस्कृती, समाजाचे वास्तवाचे चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यानुसार जगातील लोक उत्तराखंडच्या समृद्ध चित्रपट परंपरेला योग्य न्याय देतील.
शुद्ध पाण्याचे महत्त्व
संतोष रावत यांच्या दिग्दर्शनाखाली निर्मित “पाताल-ती’ हा चित्रपट मार्मिक विषयाला स्पर्श करतो. चीन सीमेलगत असलेल्या आदिवासी समुदायातील एक वृद्ध आपली शेवटची इच्छा म्हणून स्वच्छ, शुद्ध पाणी पिण्याची मनीषा व्यक्त करतो. कधीकाळी त्यांचे बालपण पर्वतीय भागातील शुद्ध पाणी चाखण्यात गेलेले असते. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प पणतू करतो आणि तो दुर्गम भागात शुद्ध पाण्याच्या शोधात निघतो. यासाठी तो बराच संघर्ष करतो. काळानुसार आपण शुद्ध पाणी गमावत आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला आहे. प्रदूषणामुळे पाण्याचा गोडवा हरवून बसलो आहोत. आगामी काळात हे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.
परदेशी प्रेक्षकांचा प्रतिसाद
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हिमालयीन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्रपटाला परदेशी प्रेक्षकांनी देखील भरभरून दाद दिली आहे.