देवा तुज ऐसा निजगुरु ।
आजि आर्तीधणी कां न करूं।
एथ भीड कवणाची धरूं ।
तूं माय आमुची
वारी म्हटलं, की तिच्या परंपरा, रीतरिवाजांचा उल्लेख होतो. त्यातील अनेक घटना, प्रसंगांबद्दल जनसामान्य नागरिकांमध्ये कुतूहलदेखील आहे. बऱ्याचदा बारकाईने निरीक्षण केल्यानंतरही काही परंपरांचा थांग लागत नाही. त्यामुळे “हे असं का?’ प्रश्न निर्माण होतो. यापैकीच एक कुतूहल म्हणजे, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात चोपदाराच्या हाती चांदीची मुठ असलेला दंड का असतो? या दंडाचा उपयोग काय? ही परंपरा कधीपासून सुरू झाली?’ वगैरे… तर श्री हैबतरावबाबा आरफळकरांनी वारीसाठी शिस्त घालून दिली आहे. तिचे पालन प्रत्येक वारकऱ्यास बंधनकारक आहे. पण, त्याचे पालन होते का? हे पाहण्याची जबाबदारी चोपदार यांच्याकडे आहे.
माऊलींच्या पालखी सोहळ्याचे राजाभाऊ, रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्याकडे परंपरेनुसार चोपदार हे पद आहे. माऊलींचे आगमन आणि प्रस्थान यांची घोषणा करणे, वारीबाबतची घोषणा करणे, सर्व दिंड्यांच्या चोपदारांशी संपर्क ठेवून शिस्तपालन ठेवून पालखी सोहळ्यात समन्वय ठेवणे, हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. त्याचबरोबर चोपदार स्थानिक पोलिसांशी, ग्रामपंचायतींशी सहकार्य करून मुक्कामाच्या किंवा विसाव्याच्या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था राखणे इ. तर, पालखी सोहळ्यात रोज पहाटे 4 वाजता अश्वांना निमंत्रण द्यायला चोपदार येतात आणि त्यानंतर साडेपाच वाजता अश्व दर्शनासाठी माउलींच्या पादुकांपाशी येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. जिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो.
चोपदार म्हणजे कोण?
आधी म्हटल्याप्रमाणे श्री हैबतरावबाबा आरफळकरांनी वारीसाठी शिस्त घालून दिली आहे. तिचे पालन प्रत्येक वारकऱ्यास बंधनकारक आहे. पण, त्याचे पालन होते का? हे पाहण्याची जबाबदारी चोपदार यांच्याकडे आहे. “चोपदार’ या शब्दाची व्युत्पत्ती “चोब-गार’ या फारसी शब्दापासून झाली आहे, असे सांगितले जाते. “चोब’ म्हणजे लाकडी दंड, “गार’ म्हणजे धारण करणारा. संस्कृतात यास “दंडधारी’ म्हणतात. थोडक्यात राजाचा माणूस.
चोप उंचावताच सर्वत्र शांतता
वारी काळात वारकऱ्यांची समस्या मांडण्याची पद्धत ठरलेली असते. तळावर पालखी मुक्कामापूर्वी समाज-आरती होते. माऊलींच्या तंबूसमोर पालखी थांबलेली असते. दिंड्या गोलाकार थांबतात. चोपदारांनी चांदीची मुठ असलेला चोप उंचावताच क्षणात भजन थांबते. अशा वेळी चोपदाराच्या चोपाकडे लक्ष देऊन पाहणारे वारकरी पाहिले असता, वारीतील शिस्तीचे दर्शन होते. क्षणात सर्व कुजबूज बंद होते. मात्र, ज्यांना काही समस्या आहेत, अशी मंडळी टाळ-मृदंग वाजवणे सुरूच ठेवतात.
मग चोपदार त्यांच्या जागेवर जाऊन समस्या समजून घेतात. त्या सोडविण्याचे आश्वासन देतात. मगच सर्व शांत झाल्यावर नंतरच आरती होते. म्हणजे वारकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर माऊली तंबूत विसावतात. समस्या गंभीर असेल, तर त्यांचा निर्णय वारीतील बैठकीमध्ये होतो. वारीत दिंडी संघटनेची बैठक दिंडीचे मालक आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली असते. ती शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली घेण्यात येते. तेथे शितोळे सरकार, चोपदार, वासकर, देवस्थान विश्वस्त, दिंडी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यात घेतलेला निर्णय सर्वांना बंधनकारक असतो.