श्रीगोंदा – हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले श्री संत शेख महंमद महाराजांचा पालखी सोहळा प्रथमच विठुरायाच्या भेटीला सोमवारी मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्यात दोन हजार वारकरी सामील झाले आहेत. यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या पालखी सोहळ्यास श्रीगोंदेकरांनी पालखी प्रदक्षिणा मार्गावर सडा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
या आषाढी वारीत संत तुकाराम महाराज व संत शेख महंमद महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांची पिराची कुरवली येथे पहिली गळाभेट होणार आहे. पालखी सोहळा निघण्यापूर्वी माऊली या अश्वाचे पूजन व पालखी रथ पंढरीकडे नेणारे संदीप बोदगे यांच्या नंदीचे पूजन करण्यात आले. महादजी शिंदे व कन्या विद्यालयातील मुलींच्या ढोल पथकाने लक्ष वेधून घेतले.
बाबूमियॉं संगीत बॅंड आणि अनिल ननवरे यांच्या बासरीने वारकऱ्यांचा उत्साह वाढविला. पालखीला निरोप देण्यासाठी संत शेख महंमद महाराज यांचे वंशज, आ. बबनराव पाचपुते, माजी आ. राहुल जगताप, “बीआरएस’चे घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, तहसीलदार मिलिंद कुलथे, निरीक्षक भोसले उपस्थित होते.