शंकर दुपारगुडे
कोपरगाव – विखे पितापुत्रांचा पराभव करुन स्व. शंकरराव कोल्हे यांच्या नातवाने गणेश कारखान्याच्या माध्यमातून यशस्वी झेप घेवून कोल्हे परिवार सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांच्याबरोबर आहे. संकटात सापडलेल्या सभासद, शेतकऱ्यांच्या मदतीला धावून त्यांना अमृत संजीवनी देण्याचे काम करीत असतात. कोल्हे यांच्या कार्याची पावती म्हणून श्री गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून 19 जागापैकी 18 जागांवर विजय मिळवला.बाळासाहेब थोरातांच्या सहकार्याने विवेक कोल्हे यांनी या निवडणुकीत जोरात झेप घेत विखे पितापुत्रांची झोप उडविली.
कोपरगाव व राहाता तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला श्रीगणेश सहकारी साखर कारखाना पुणतांबा, वाकडी व गणेश परिसराची कामधेनू आहे. या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आणि संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीने वेधले. राज्याचे दोन तुल्यबळ नेते अर्थात विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कॉंगेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात ही लढत झाली. दोघेही एकमेकांच्या विरोधात उतरले, मात्र या निवडणुकीत शेतकरी, सभासदांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू अर्थात जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना या निवडणुकीत विखे यांच्या विरुद्ध पॅनल उभं करून या कारखान्याला नव संजीवनी देण्याची विनंती करीत निवडणुकीच्या रिंगणात आपल्याच राजकीय पक्षाच्या नेत्याविरुद्ध उभे करण्यास अग्रह धरला.
स्व.शंकरराव कोल्हे त्यांच्या हयातीत केवळ पक्ष म्हणून काम न करता जनहितासाठी काम केले. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी स्व.कोल्हे प्रसंगी स्वकियांच्या विरोधात उतरून आक्रमक आंदोलन करणारे नेते अशी ओळख होती. त्यांच्या विचारांचा वारसा घेवून राजकारणात उतरलेले विवेक कोल्हे या निवडणुकीत सर्वांना प्रति शंकरराव कोल्हे वाटू लागले. म्हणुनच की काय विवेक कोल्हे यांची इच्छा नसताना या निवडणुकीत त्यांना खेचले गेले. श्रीगणेश कारखान्याची निवडणूक बघता बघता कोल्हे विरुद्ध विखे अशीच सुरु झाली. विवेक कोल्हे यांच्या नावाने विविध प्रकारच्या चर्चा रंगल्या.
विवेक कोल्हे यांना ही निवडणूक खुप कठीण जाणार, भविष्यात कोल्हे गटाला हि निवडणूक महागात पडणार, विखेंच्या पुढे कोणाचं काहीच चालणार नाही. विखेंशी जुळवून घेतलं असतं तर आगामी विधानसभा कोल्हेंना सोपी जावू शकते. विखेंशी पंगा घेतल्याने आता विवेक कोल्हे कधीच आमदार होणार नाहीत. विखेंच्या ताकतीपुढे कोणाचे चालत नाही. या निवडणुकीचा सर्वात मोठा धोका कोल्हेंना आहे, अशा प्रकारच्या चर्चा राहाता व कोपरगाव तालुक्यात रंगु लागल्या. निवडणुकीची रंगत जसं जशी वाढू लागली तसतशी विखेंची पंगत वाढत होती. प्रचाराच्या अंतिम दिवशी विखेंनी सभासदांना आंबरसाचे जेवण दिले पण सभासदांनी विखेंच आंबरस खाऊ कोल्हेंच्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून देत कोल्हेंना श्रीखंड दिल्यासारखे झाले.
आता गणेश कारखान्यात थोरात- कोल्हे यांच्या एक विचाराने अमृत संजीवनी होणार असेच चित्र झाले आहे. विवेक कोल्हे यांनी प्रचाराच्या दरम्यान अनेक भावनिक मुद्द्यांना हात घालुन विखे यांच्या टीकेला चोख प्रतिउत्तर देत होते. कमी वयात मोठा विचार असलेला युवा नेता लाभल्याने गणेश परिसरातील नागरिकांनी विवेक कोल्हे यांना फक्त डोक्यावर न घेता डोक्यात घेतले. आणि मतांच्या रुपाने प्रेम व्यक्त केले. या निवडणुकीत स्व. कोल्हे व संपूर्ण कोल्हे परिवारातील प्रत्येकांच्या आठवणींना उजाळा मिळत होता. विखे यांच्या विचारांचे सभासद कोल्हे यांच्याकडे आकर्षित होत होते. अखेर निकालातून एकहाती सत्ता देत विखेंना श्रीगणेश कारखान्यापासुन सभासदांनी वेगळे केले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अल्पमतांनी पराभव झाला होता. त्या पराभवाची आठवण गणेश परिसरातील नागरिक करुन देत होते. विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून परिवर्तन करण्याची खुनगाठ नागरिकांनी बांधली होती.म्हणुनच की काय गणेश कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे यांना भरभरून प्रतिसाद मिळत होता. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली सर्व शक्तीपणाला लावली होती. इतकं सर्व करूनही हि निवडणूक चुरशीची होईल असं असताना अंतिम क्षणी विखे यांना केवळ एक जागा मिळाली तर उर्वरित अठरा जागांवर थोरात, कोल्हे गटाने मुसंडी मारून जिल्ह्याच्या राजकारणात नव्या राजकीय समिकरणाचा श्रीगणेशा केला. श्रीगणेश कारखान्याची अवस्था दयनीय झाली आहे.
या साखर कारखान्याला थोरात अमृत देवून तर कोल्हे नवसंजीवनी कसे देतात. याकडे लक्ष लागले आहे. डबघाईत असलेल्या गणेश कारखान्याची परिस्थिती सुधारण्याची मुख्य जबाबदारी आता युवा नेते विवेक कोल्हे यांच्यावर अवलंबून आहे. गणेश कारखान्याच्या माध्यमातून कोल्हे यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला आहे. आगामी काळात विखेंच्या विरोधाला कसे हाताळतात. किंवा त्यांच्याशी पुन्हा कसे संबंध ठेवतात. यावरून भविष्यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.