राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत सर्वच पातळ्यांवर प्रतीक्षाही आहे आणि उत्सुकताही. या संस्थांवर सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे राज्य आहे. त्यामुळे निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींच्या ताब्यात या संस्था लवकरात लवकर आल्या पाहिजेत, अशी भावना जोर धरू लागली आहे. काही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून कधीपासूनच तयारी केली आहे. पण निवडणुकीचं घोंगडं अडकल्याने अनेकांची गोची झाली आहे. निवडणुका लांबणीवर पडत असल्या की राजकारण रंगू लागते. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप- प्रत्यारोपांच्या लढाया ठिकठिकाणी झडू लागल्या आहेत.
निवडणूक मग ती कोणतीही असो सर्वात प्रथम तिची चाहूल लागते ती सातारा शहरात. दोन्ही राजांच्या गटांची सुंदोपसुंदी सुरू झाली की निवडणुका येत असल्याचे चित्र समोर येऊ लागते. त्यात आता आणखी एका शहराची भर नव्याने पडली आहे. फलटणची. फलटणचा आखाडाही आता आरोप- प्रत्यारोपाचे रणांगण बनू लागला आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यात तुलनेने अजूनही पडघम वाजलेले नाहीत. मात्र, सातारा आणि फलटण या दोन तालुक्यांत रणधुमाळी सुरू झाली आहे.
नगरपालिकेवर प्रशासक आल्यापासूनच साताऱ्यात पत्रक वॉर सुरू झाले. अर्थातच ते अपेक्षितच होते. मनोमीलन होणार की लढत होणार अशा चर्चांनी सुरवात होते. मग एकमेकांवर कोणत्याही पातळीपर्यंत जाण्याची तयारी ठेवत सर्वसामान्यांना चर्चेचे खाद्य पुरविले जाते. इच्छुकांच्या आपापल्या प्रभागातील कार्यक्रमांची रेलचेल वाढते. दोन्ही नेत्यांचे दावे प्रतिदावे तिथेही सुरू राहतात. साताऱ्याच्या रणांगणात यापलिकडे काही होत नाही. कोणत्या तरी एकाची सत्ता येते आणि दुसऱ्या नेत्याची आघाडी विरोधात बसते. चुकून कोणी तिसरा या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करू लागला की मनोमीलनच्या डावपेचाने यात बदल होतो.
याच पद्धतीने यावर्षी पत्रकांद्वारे श्रेयवादाबरोबरच आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठिकठिकाणच्या प्रभागांतील इच्छुकांच्या कार्यक्रमात रंग भरू लागले आहेत. हे सारे सुरू असतानाच गेल्या आठवड्यात सातारा शहरातीलच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष एका चित्राने वेधून घेतले. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील निवासस्थानाशेजारील इमारतीच्या भिंतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे चित्र रेखाटण्याचे काम सुरू झाले. त्याबाबत तशी कुणाचीच हरकत नव्हती. मात्र, पोलीसांनी चित्रकाराला हटकले. काम बंद झाले. पालकमंत्र्यांनीही आमची उदयनराजेंशी मैत्री असल्याचा दाखला दिला. मात्र, शिवेंद्रसिंहराजेंनी चित्राबाबतच्या घडामोडींमुळे काही टीपणी केली. उदयनराजेंनी त्याला प्रत्त्युत्तर दिले. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत अशाच पद्धतीने विषय चर्चिले जाणार यात शंका उरत नाही.
शहरातील भुयारी गटाराच्या कामाला गती नाही. ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, अतिक्रमणांचे अडथळे, पार्किंगची समस्या, अनेक रस्त्यांची कामे मंजूर होऊनही सुरू झाली नाहीत. याची चर्चा नाही झाली तरी चालते. हद्दवाढीत नव्याने आलेल्या भागातील अडचणींबाबत चर्चा नाही झाली तरी चालेल. मात्र, चित्रासारख्या किंवा पोस्टरयुद्धाच्या चर्चांमध्ये सातारकर रंगून जातात, ही नस शहरातील दोन्ही प्रमुख आघाड्यांनी ओळखली आहे. त्यामुळे अशा मुद्द्यांभोवती सातारचे राजकारण प्रत्यक्ष निवडणुका होईपर्यंत बहरत जाणार आहे. सातारचेच लोण आता फलटणमध्ये पोहचले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचेच एकतर्फी वर्चस्व फलटणतालुक्याने अनुभवले. पण बदल झाला.
माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले. एकतर्फी वर्चस्वाला शह देण्यासाठी पर्याय निर्माण झाला. तिथेही निवडणुकांची चाहूल लागली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्यासमवेत रणजितसिंहांनी तोफ डागायला सुरूवात केली. रणजितसिंह यांच्याकडे यापूर्वी तसे दुर्लक्ष करणारे रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली. सातारप्रमाणेच फलटणमध्ये आरोप- प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला. सत्ताधारी राजेगटाकडून दुखावलेले तालुक्यातील काही नेतेमंडळीही उघडपणे रणजितसिंह यांच्या जोडीने या सिलयिल्यात सहभागी होऊ लागले. दोन्ही तालुक्यांतील स्पर्धा वाढली आहे.
ही स्पर्धा निकोप व्हायला हवी. यांनी एक काम केले तर त्यांनी दोन कामे करावीत, अशी विकासासाठीचीस्पर्धा असावी. अशी स्पर्धा खिलाडूवृत्तीने जोपासावी. असे झाले तर दोन्ही तालुके महाराष्ट्रात सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने अग्रेसर राहतील. हे खरे आहेच. पण ते स्वप्नरंजन ठरू शकते हाही धोका आहेच. हे सारे लोक पाहत आहेत. आज ना उद्या निवडणुका होणारच आहेत. त्यावेळी लोकांची काय भूमिका असेल त्यावरच विकासाचा रस्ता कसा असेल ते ठरणार आहे.