उंडाळे- कराड तालुक्यातील उंडाळे भागातील जिल्ह्यातील शेवटचे टोक असणाऱ्या येणपे- लोहारवाडी येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या रिक्षाच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून मृतांमधे पलुंद्रे (ता. शाहूवाडी जि. कोस्हापूर) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला.
पुण्यावरून यात्रेसाठी गावी निघाल्यावर आई, वडिल आणि मुलगी यांच्यावर काळाने घाला घातला. तर मुलगा गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातात सुरेश सखाराम महारूगडे, सुवर्णा सुरेश महारूगडे यांच्यासह मुलगीचा अंत झाला. या घटनेने पणुंद्रे गावासह शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली. दरम्यान महारूगडे यांच्या नातेवाइकांसह मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. पणुंद्रे गावची यात्रा असल्याने पुण्यात कामानिमित्त राहत असलेले महारूगडे कुटुंबीय गावी येत होते.
शनिवारी पहाटेच्या सुमारास लोहारवाडी- येणपे गावाजवळ ते प्रवास करत असलेल्या रिक्षाला भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी जाऊन जखमींची विचारपूस केली. नेमका अपघात कसा झाला याची चौकशी सुरू केली आहे. या भीषण अपघाताची चर्चा पसरल्याने घटनास्थळावर गर्दी झाली होती. अपघात इतका भयंकर होता की रिक्षाचा चक्काचूर झाला आणि रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.