पुणे – पोलिसांचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासाठी टीका केली जात आहेत. खोटे आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून आरोप करावेत, असे म्हणत राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका केली.
पुणे शहरातील अत्याचाराच्या घटनांचा आणि पुणे पोलिसांचा विविध योजनांचा आढावा चाकणकर यांनी घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेचे अपहरण प्रकरणासंदर्भात चाकणकर म्हणाल्या, या संदर्भात पीडितेने शनिवारी मध्यरात्री महिला आयोगाकडे तक्रार केली होती.
परंतू, रविवारी प्रशासकीय सुटी असल्याने कार्यालय बंद होते. त्यामुळ सोमवारी सकाळी तिचा इमेल आम्हांला मिळाला. तिने केलेल्या मागणीचा अर्ज पुणे पोलिसांना पाठविला आहे. तिने संपूर्ण वैद्यकीय तपासणीची मागणी केली आहे, तिची तपासणी केली जावी यासाठी पोलिसांना सकाळी लवकरच पत्र पाठविले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
रघुनाथ कुचिक न्यायालयाच्या आदेशानुसार जामीनावर मुक्त आहेत, त्याचा तपास देखील सुरू आहे. असे असताना भाजप नेत्या चित्रा वाघ खोटी माहिती माध्यमांमध्ये पसरवित आहेत. कुचिक यांच्या विषयी अपमानजनक टिका करत आहेत. त्यामुळे कुंटुंबियांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहचला आहे.
अशा पध्दतीने टिका होत असताना संबंधीत फिर्यादी आणि चित्रा वाघ ह्या संगणमताने मिडीया ट्रायल चालवत आहे. त्यामुळे संबंधीत महिला आणि चित्रा वाघ यांच्या संगणमताची चौकशी व्हावी व त्यांची नार्को चाचणी करावी अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी करावी व चौकशी नंतरचा अहवाल माहिला आयोगाला पाठवावा असे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.
प्रज्वला योजनेचा पैसा निवडणुकीच्या प्रचारासाठी
मागील सरकारच्या काळात प्रज्वला योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या प्रश्नावर आमदार मनिषा कायंदे यांनी विधान सभेत बाजू मांडली. त्यासाठी समिती नेमण्याचीही मागणी त्यांनी केली. त्यावर चाकणकर यांनी सांगितले, मनिषा कायंदे यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती देखील मागवली होती. याबाबत मला खंत देखील वाटत आहे.
यापूर्वीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी व त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रज्वला योजनेचा गैरफायदा घेतल्याचे आढळून आले आहे. ही माहिती लक्षवेधी मधून दिली जाईल असेही त्या म्हणाल्या. आम्हाला जी माहिती मागितली ती आम्ही दिली आहे. प्रज्वला योजनेचा पैसा पक्षाच्या प्रचारासाठी वापरला गेला अशी तक्रार मनिषा कायंदे यांनी केली होती. याचा तपास झाला आहे, तो विधानसभेत लक्षवेधीमध्ये मांडला आहे.