बीड – रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी त्यांच्या दरबारात महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे गडचिरोलीमधील वन विभागात असलेल्या एका प्रकरणात संबंधित महिलेला महिला आयोगाच्या कार्यालयातून हाकलून लावण्यात आले. त्या महिलेने आतापर्यंत महिला आयोगाकडे न्याय मागण्यासाठी किती वेळा अर्ज आणि विनवणी केली, याचे पुरावे संगीता चव्हाण यांनी दाखवले आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळाला. मात्र रूपाली चाकणकर या फक्त आता आपल्या पक्षाचे काम करत असून महिलांना न्याय मिळत नसल्याचे आरोप संगीता चव्हाण यांनी केले आहेत. तर दुसरीकडे फक्त गडचिरोली येथील प्रकरणच नाही तर राज्यातील वेगवेगळ्या भागातील महिला देखील महिला आयोगात तक्रारी करतात. मात्र, त्यांना कुठल्याच प्रकारची मदत किंवा न्याय मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोग बरखास्त करावा आणि रूपाली चाकणकर यांना पदावरून पाठवण्याची मागणी संगीता चव्हाण यांनी केली आहे.
..तर राजीनामा द्यावा
चव्हाण या महिला आयोगाच्या सदस्य आहेत. तर बीड मधील उद्धव ठाकरे गटाच्या त्या शिवसेनेच्या पदाधिकारी देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाकणकर या महिलांच्या तक्रारी जाणून घेत नसल्याने माझ्याकडे अनेक महिला तक्रारी घेऊन येत असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला आयोगाची भूमिका महिलांना न्याय देण्याची नसेल तर रूपाली चाकणकर यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असेही त्या पुढे म्हणल्या आहेत.