काठमांडू ( china nepal conflict ) – नेपाळच्या सीमेजवळील चिनी सैन्याच्या हालचाली अलिकडील काही दिवसांत वाढल्या असून, नेपाळमधील दौलखा जिल्ह्यातील सीमेवरील खांब गेल्या काही दिवसांपासून गायब झाले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करणे आणि कुरापतखोर वृत्तीचे चीनकडून पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दौलखा जिल्ह्यातील विगू गावातील या घटनेबद्दल नेपाळच्या गृह मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाला कळवले आहे.
चीन आणि नेपाळदरम्यान 1960 मधील करारापासून नियंत्रित सीमा यंत्रणा अस्तित्वात आहे. यानुसार दोन्ही देशांमध्ये 1961 मध्ये सीमा करार करण्यात आला आणि सीमेवर खुणेसाठीचे खांबही उभारण्यात आले. ( china nepal conflict )
या करारानंतर सीमेमध्ये वारंवार बदल झाले आणि कायमस्वरूपी उभारलेले खुणेचे 76 खांब हलवले गेले. आता सीमेवरील स्थिती आपल्याला अनुकूल करून घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनने नेपाळच्या हद्दीमध्ये घुसखोरी केली होती आणि नेपाळमधील हुमला या दुर्गम जिल्ह्यात तब्बल 14 इमारतींचे बांधकामही केले होते. हुमलावर नेपाळने आपला हक्क सांगितला आणि अर्थातच चीनने नेपाळचा हा दावा फेटाळला होता.
यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि नेपाळमधील चिनी दूतावासाबाहेर निदर्शनेही झाली होती. ज्या भागात चीनने या इमारती बांधल्या त्या भागातील सीमेचे खांब काही वर्षांपासून गायब आहेत.
स्थानिक महापालिकेनेही चीनच्या वादग्रस्त दाव्याविरोधात आवाज उठवला आहे. मात्र, या संदर्भात नेपाळकडून चीनशी झालेला चर्चेचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. चिनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी लष्करी वाहनातून येऊन नेपाळी अधिकाऱ्यांना माघार घेण्यासाठी दमदाटी केली होती.
अनेक जिल्ह्यांमध्ये चीनची घुसखोरी
नेपाळमधील सीमेचे खांब गायब होणे ही नवीन घटना नाही. नेपाळमधील कृषी मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार गोरखा, डोलाखा, हुमला, दार्चुला, सिंधुपाल चौक, रसुरा आणि सांखुव्यासभा यांसारख्या सीमेवरील काही जिल्ह्यांतही चीनने घुसखोरी केलेली आहे.
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी चीनच्या या अतिक्रमणाचा बचाव केल्यामुळे सीमेवरील खुणेचे खांब गायब होण्याची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
नेपाळी कॉंग्रेस पक्षाने सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीकाही केली आहे. मात्र, नेपाळ सरकारच्या भूमिकेमुळे चीनचे आयतेच फावले आहे.
सध्याच्या करोनाच्या परिस्थितीत निर्माण झालेल्या आर्थिक ताणामुळे नेपाळ चीनशी थेट टक्कर घेऊ शकत नाही. त्याचाच फायदा घेऊन चीनने सीमेवरील आणखी खांब गायब केले आहेत.