इटानगर: चीनच्या सैन्याने अरुणाचल प्रदेशमधील दुर्गम अंजॉजिल्ह्यात घुसखोरी करून तेथील ओढ्यावर पूल बांधला असल्याचा आरोप भाजपच्या एका खासदाराने केला अहे. तपिर गाओ असे या खासदाराचे नाव आहे. चीनच्या सैन्याने गेल्या महिन्यातच भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून चागलागाम परिक्षेत्रातील किओम्रु या नाल्यावर पूल बांधला असल्याचा आरोप गाओ यांनी केला आहे. काही स्थानिक युवकांनी मंगळवारी हा पूल बघितला आणि आपल्या निदर्शनास आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ठिकाण चागलागामपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असून भारतीय हद्दीत खूप आतपर्यंत आहे, असेही गाओ यांनी म्हटले आहे. आतापर्यंत भारतीय लष्कराच्या कोणाही अधिकाऱ्याकडून अथवा अरुणालचल प्रदेशातील कोणाही प्रशासकीय अधिकाऱ्याकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतीय लष्कराच्या गस्त पथकाला या भागात चीनी सैनिकही दिसले होते, असा दावाही गाओ यांनी केला आहे. या भागातील संपर्क यंत्रणा अधिक सुस्थितीत असणे गरजेचे आहे. म्हणून हायुलियांग अणि चागलम् येथील खराब रस्ते तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे, अशी मागणीही गाओ यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.