माधव विद्वांस
पुरोगामी विचारांची कास धरून स्वातंत्र्याबरोबरच शिक्षण आणि ज्ञानसाधनेचा ध्यास घेऊन काम करणारे डॉ. जे. पी. नाईक यांची आज जयंती. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1907 रोजी कोळपूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे झाला. त्यांचे मूळ नाव विठ्ठल हरी घोटगे असे होते. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत स्वतःला झोकून दिले होते. घरच्या तसेच नात्यातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून असहकार चळवळीत 1930 मध्ये भूमिगत असताना त्यांनी आपले नाव बदलले व ते जयंत पांडुरंग नाईक झाले. पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.
नाईक यांनी महात्मा फुले यांचा आदर्श पुढे ठेवून वंचितांच्या शिक्षणाच्या समस्यांसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. त्यांच्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. म्हणूनच युनेस्कोसारख्या संघटनेच्या “थिंकर्स ऑन एज्युकेशन’च्या (1997) चार खंडांत जगातील 100 शिक्षणतज्ज्ञांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह डॉ. जे. पी. नाईक यांचा समावेश आहे. शासनाने त्यांच्यावर अनेक शैक्षणिक समस्यांवर अहवाल देण्याचे काम सोपविले होते. त्यानुसार अनेक सरकारी अहवाल त्यांनी सादर केले.
महात्मा फुले- महात्मा गांधी व मार्क्स यांच्या विचारांचे सार त्यांच्या “भारतीय जनतेचे शिक्षण’ (1978) व “शिक्षण आयोग आणि तद्नंतर’ (1979) या दोन पुस्तकांत प्रतिबिंबित झाले आहे.
1975-77 या आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील 40 शिक्षणतज्ज्ञांचा अभ्यासगट जे. पी. नाईक यांच्या नेतृत्वाखाली नेमला होता. त्यानुसार जे. पी. नाईक यांनी “भारतीय जनतेचे शिक्षण’ हा 75 पानांचा अहवाल प्रसिद्ध केला होता.
त्याला “जेपीं’नी समर्पक प्रस्तावना लिहिली आहे. “शिक्षण आयोग व तद्नंतर’ हे त्यांचे मृत्यूपूर्वीचे शेवटचे पुस्तक! स्वातंत्र्यसैनिक म्हणून बेल्लारीच्या तुरुंगात सजा भोगत असताना जे. पी. नाईकांनी गंधकाची भुकटी व गोडेतेल यांच्या मिश्रणातून त्वचारोगावर परिणामकारक असे मलम तयार केले होते. तुरुंगातील कैद्यांच्या त्वचारोगावर हे वापरले गेले व त्यामुळे चांगला परिणाम दिसून आला. यासाठी बक्षीस म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेत सूट देऊ केली. पण शिक्षेत सूट देण्यापेक्षा बक्षीस म्हणून वाचायला वैद्यकशास्त्राची पुस्तके द्यावीत, अशी मागणी नाईकांनी केली आणि त्यांची ही मागणी इंग्रज सरकारने पुरी केली.
जे. पी. नाईक यांनी तुरुंगातून सुटल्यावर धारवाड जिल्ह्यातील उप्पीनबेट्टीगेरी या छोट्याशा खेडेगावात आपले समाजकार्य सुरू केले. तेथे त्यांनी गावकऱ्यांना स्वच्छता व आरोग्याचे धडे दिले तसेच साक्षरता मोहीमही राबविली. मुंबईच्या गव्हर्नरांनी उत्कृष्ट गावासाठी पारितोषिक म्हणून ठेवलेली “ग्रामीण सुधारणा ढाल’ उप्पीनबेट्टीगेरीसारख्या छोट्या गावाला नाईकांमुळे मिळाले. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांची पत्नी डॉ. चित्रा नाईक यांचाही सहभाग होता. जे. पी. नाईक यांना भारत सरकारने 1974 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.