बीजिंग- “कोविड-19′ विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या चीनला भारताकडून सर्व प्रकारची मदत दिली जाणार आहे. लवकरच औषधांचा नवीन साठा चीनला पाठवला जाणार आहे. चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिस्री यांनी आज ही माहिती दिली. या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी चिनी नागरिकांबद्दल सहवेदना देखील व्यक्त केली आहे. चीनच्या नागरिकांबद्दल मैत्री, सौहार्द आणि सद्भावना व्यक्त करण्यासाठी भारताकडून ही मदत पाठवली जाणार आहे. या अडचणीच्या वेळी चीनच्या लोकांना मदत करण्यासाठी भारत आपल्या मार्गाने सर्व काही करेल, असेही मिस्री म्हणाले.
चीनमध्ये “कोविड -19′ मुळे मरण पावलेल्यांची संख्या 1,665. वर पोहोचला आहे. आज आणखी 142 नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चीनला आवश्यक असलेल्या मदत साहित्याचा तपशील गोळा केला जात आहे. त्यानुसार लवकरात लवकर मदत साहित्य चीनला पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याबरोबरच चीनमध्ये आयातीसाठी मागणी झालेल्या वैद्यकीय साहित्यावर असलेली निर्यातबंदीही भारताने उठवली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे मेडिकल मास्क, ग्लोव्हज आणि सूटची चीनमध्ये मोठी मागणी आहे. गेल्या काही आठवड्यात तेथील विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता निश्चित कालमर्यादेमध्ये हे साहित्य तेथे पाठवले जाईल, असे मिस्री यांनी एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.