आरिफ शेख
गत पाव शतकातील सर्वात मोठी टोळधाड सोमालिया जवळील हॉर्न ऑफ आफ्रिकेतून निपजली आहे. केनिया, सोमालिया व इथिओपिया नंतर तिने ओमानच्या खाडीकडे मोर्चा वळविला आहे. पुढे तिचा प्रवास इराण व पाकिस्तान मार्गे भारताच्या दिशेने सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने वरील देशांना याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. पीकपाणी- शेती व उभे पीक उद्ध्वस्त करणारे काय आहे हे अस्मानी संकट?
भारत-पाकला टोळधाडीचे संकट नवे नाही.दर दोन वर्षातून अशा धाडी पिकावर येत असतात.जून-जुलै दरम्यान तिचा उपद्रव व्हायचा. आता मात्र वाळवंटातून निर्माण झालेली ही टोळधाड आफ्रिका व दक्षिण आशियातील अनेक देशांपुढे “आ’ वासून उभी आहे. तिचे गांभीर्य युनोच्या फूड अँड अग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन (एफएओ)ने लक्षात आणून दिले आहे. वरील देशांनी सतर्क राहून या टोळधाडीचा मुकाबला करावा, असे युनोने एका निवेदनात म्हटले आहे.
पंचवीस वर्षांतील आफ्रिका व आशियातील ही सर्वात मोठी टोळधाड असेल, शिवाय सत्तर वर्षांत केनियात अशी खतरनाक टोळधाड आली नसल्याचे तेथील लोक सांगतात.
टोळधाडीचे मुख्यत्वे चार प्रकार आहेत. 1) ट्री लोकस्ट 2) बॉम्बे लोकस्ट 3) मायग्रेटरी लोकस्ट 4) डेझर्ट लोकस्ट. पैकी डेझर्ट लोकस्ट ही टोळधाड सर्वात घातक समजली जाते.कारण तिचे निर्मूलन करणे सहज शक्य होत नाही आणि प्रचलित कीटकनाशकांना ती दाद देखील देत नाही. गेंड्याच्या शिंगाचा आकार आफ्रिका खंडाच्या नकाशात सोमालिया जवळ दिसतो, त्या भागाला हॉर्न ऑफ आफ्रिका म्हटले जाते. तेथूनच या टोळधाडीचा उद्रेक झाला आहे. इथिओपिया व केनियाला तिचा फटका बसला. तिने उभे पीक, झाडाचा पाला, झुडपे व हिरवाई फस्त केली. सोमालियात तोच कित्ता गिरवला.आफ्रिका खंडात आधीच अन्नधान्य टंचाई असते. सोमालियाला तर भूकबळी नवी नाही.टोळधाड येणे म्हणजे महासंकट व दुष्काळाची चाहूल म्हणून हे देश त्याकडे पाहतात.
आफ्रिकेतून सुरू झालेली ही “वावटळ’ एका जागी स्थिरावली नाही. ती ओमानच्या आखातात शिरली. तेथील खाडी देशांना याचा फटका बसला. नंतर हे संकट इराणकडे सरकले. तेथील शेतीचा फन्ना उडविला. इराणनंतर पाकिस्तान व पुढे भारत या टोळधाडीचे संभाव्य लक्ष्य असेल. उपग्रहाच्या छायाचित्रातून तिचा मार्ग काय असेल याचा अदमास आला आहे. हे संकट तूर्तास भारतात पोचलेले नाही. मात्र युनोच्या समितीने भारत-पाकला याबाबत सावध करीत आवश्यक त्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही टोळधाड आपल्या मार्गात येणारी हर प्रकारची हिरवाई गट्टम करते. शेतीची व शेतकऱ्यांची तर ती दुष्मन. भूमीपुत्रापुढे काळ बनून ती उभी राहत आहे. वरील प्रवासात तिची संख्या घटत नाही. उलट कैकपटीने ती वाढत जाते.
प्रवासातील तिची वंशवृद्धी तिला अधिक धोकादायक बनविते. एका टोळाचे जीवनचक्र सुमारे आठ आठवड्यांचे असते. आपल्या वजनाइतके खाद्य त्याला दरदिवशी लागते. ते सर्व समूहाने प्रवास करतात. उड्डाण करीत असताना खाली जमिनीवर सावली पडते, तर दूरवरून त्यांचे थवे आकाशातील ढगाप्रमाणे दिसतात. एका दिवसात दीडशे किलो मीटरचा प्रवास ते करतात. त्यांचे अनेक थवे असतात. एका थव्यात दोनशे ते तीनशे बिलियन टोळ असू शकतात. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास भूतलावर मानवाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे तीसपट टोळ हे एका थव्यात असू शकतात.सर्वात लहान थवा हा किमान पन्नास हजार लोकांच्या एक वेळेच्या जेवणाइतके अन्न फस्त करतो. पूर्वी जून-जुलै हा त्यांचा भारतातील हल्ल्याचा कालावधी होता.
यंदा मात्र ही टोळधाड आकाराने (संख्येने) सर्वात मोठी आहे. अब्जावधी टोळ भारताच्या दिशेने निघाले आहेत. आपल्यासाठी अल्प समाधानाची बाब एवढीच की आपल्या आधी ते पाकच्या शेतीची वाट लावतील व नंतर भारतात येतील. राजस्थानच्या जैसलमेर, बिकानेर, सांचोर तहसील या भागातील शेती या संभाव्य टोळ संकटात येऊ शकते. राजस्थानला लागून असलेल्या पंजाबला देखील या टोळधाडीचा फटका संभवतो. गुजरातच्या कच्छ व बनासकाठा भागात ही टोळधाड मोठा उच्छाद निर्माण करू शकते. कीटकनाशकांची फवारणी, तीव्र क्षमतेच्या केमिकलची धुरळणी, आवाजाचा वापर, ड्रोनद्वारा कीडनाशक स्प्रे करणे आदीद्वारा तेथील शेतकरी या आव्हानाचा सामना करतात. टोळधाडीच्या उग्र संकटासमोर हे उपाय तकलादू ठरत आलेले आहेत. आता हे संकट फक्त शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. ती आंतरराष्ट्रीय समस्या झाली आहे.
भारत-पाक दरम्यान संबंध सुरळीत असताना पाककडून मिळणाऱ्या माहितीद्वारे भारत आधीच उपाय योजना करून नुकसानीची तीव्रता कमी करीत असे. तीन महिन्यांपूर्वी आलेल्या टोळधाडीची पाकने पूर्वीप्रमाणे माहितीची देवाण-घेवाण केली नाही. त्यामुळे राजस्थान, पंजाब व गुजरातच्या शेतकऱ्यांची दैना उडाली. भारत-पाकला आपसातील तणाव बाजूला ठेवत शेतकऱ्यांच्या हितासाठी पडद्यामागून का होईना माहितीची देवाण-घेवाण करून नुकसानीची तीव्रता कमी करावी लागेल. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियात या आव्हानाची फारशी चर्चा होत नसली तरी सोशल मीडियात नेटिझन्सनी मात्र शेलक्या शब्दांत या आव्हानाची दखल घेतली आहे. नेटकऱ्यांमध्ये उमटणाऱ्या प्रतिक्रियांचे काही नमुने या प्रमाणे, पाक टोळधाडीचा भारतावर अतिरेकी हल्ला, इनक्लुड देम रेसिपी, पाकवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करा, पाकला सधन होण्याचा मार्ग… टोळ धरा व चीनला नेऊन विका, टोळच्या प्रमुखाशी वाटाघाटी करा, डिव्हाईडेड बाय रिलीजन… युनायटेड बाय लोकस्ट.., अशी मल्लिनाथी वाचायला मिळाली. एकाने तिरकस टिप्पणी करीत नॉर्थ इस्ट करोना का डर… नॉर्थ वेस्ट लोकस्ट का डर, हमारा लोकेशनही ठीक नही है… असे म्हटले आहे.
टोळधाडीचा उगम कसा व का होतो यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या या टोळधाडीचा अन् क्लायमेट चेंजचा संबंध आहे. यावर चर्वितचर्वण सुरू झाले आहे. हिंद महासागरातील ओमानच्या खाडी जवळील भागात ग्लोबल वॉर्मिंगमुळे वारंवार चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. त्याचा फटका आखाती देशांना व हॉर्न ऑफ आफ्रिकेला बसत आहे. बिगरमोसमी पावसामुळे टोळाचे जीवनचक्र देखील बदलले असावे. अकस्मात झालेल्या पावसाने टोळाचे पुनरुत्पादन वेगाने घडत असावे, अन् त्यामुळेच टोळधाडीचे हे संकट उद्भवत असावे असा अंदाज काही जाणकार व्यक्त करीत आहेत. कारण काहीही असो, दोन अणवस्त्रधारी राष्ट्रांपुढे छोट्या कीटकांनी मोठे संकट उभे केले आहे, हे वास्तव स्वीकारावेच लागेल.