Children’s Day : देशभरात 14 नोव्हेंबर या दिवशी बालदिन साजरा केला जातो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन (Children’s Day 2022) म्हणून साजरा करतात. मुलांवरील त्यांचे अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन मोठ्या साजरा करण्यात येतो. मात्र बालदिवस साजरा करण्यास कधी पासून सुरुवात झाली ते आपण जाणून घेऊयात.
जगात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये 1856 मध्ये चेल्सी इथे बालदिन साजरा झाला. त्यानंतर हळूहळू जगातील इतर देशांमध्ये बालदिन साजरा करण्यास सुरूवात झाली. जागतिक पातळीवर दरवर्षी 20 नोव्हेंबरला बालदिन (Children’s Day) साजरा केला जातो. 1959 सालापूर्वीपर्यंत बालदिन ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जात असे. 1954 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार, पहिल्यांदाच बालदिन साजरा झाला.
भारतात कधीपासून साजरा केला जाऊ लागला बालदिन?
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांबद्दल विशेष प्रेम होते. त्यांना नेहमीच लहान मुलांमध्ये रमायला आवडायचे. लहान मुले पंडितजींना आवडीने ‘चाचा नेहरू’ म्हणत असे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी लहान मुलांचे आणि तरूणांचे हक्क आणि त्यांच्या शिक्षणासाठी भरपूर काम केले होते. 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले.
त्यानंतर भारतीय संसदेने पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासूनच त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो. लहान मुलांचे हक्क, अधिकार आणि शिक्षण याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा बालदिन साजरा करण्यामागचा प्रमुख हेतू आहे.