पुणे – अद्यापही एक पडदा चित्रपटगृहे पूर्ण ताकदीने सुरू न झाल्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत असलेली बालचित्रपटांची पर्वणी मिळणे दूरापास्त झाले असून, बालचित्रपट महोत्सव कुठे करावा, हा प्रश्न आयोजकांना पडला आहे.
करोना काळात बहुतेक एक पडदा चित्रपटगृहे बंद झाली आहेत. त्या चित्रपटगृहांमध्ये उन्हाळ्याच्या सुटीत बालचित्रपट दाखवले जात असत. यामध्ये बालशिवाजीपासून ते चिंटूपर्यंत अनेक चित्रपटांची मेजवानी बालगोपाळांना मिळत असे. याशिवाय खाऊचेही वाटप केले जात असे. अगदी नाममात्र शुल्कात हा महोत्सव आयोजित केला जात असे.
उन्हाळ्याची सुटी आणि बालचित्रपट महोत्सव हे पुण्यातील बालचमूसाठी अनोखे समीकरण झाले होते. “संवाद, पुणे’ आणि “कावरे आइस्क्रीम’ यांच्या वतीने गेल्या 22 वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवामध्ये चित्रपट पाहण्याबरोबरच दररोज वेगवेगळ्या स्वादाचे आइस्क्रीम ही पर्वणी मुलांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करत होती. मात्र, करोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे दोन वर्षे ही परंपरा खंडित झाली. तर, हा बालचित्रपट महोत्सव आयोजित केला जात होता, त्या विजय चित्रपटगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल उभे राहत असल्याने ते स्थळही आता उपलब्ध नाही. करोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले असले, तरी राज्य सरकारकडून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेली एकपडदा चित्रपटगृहे अद्याप बंदच असल्याने बालचित्रपट महोत्सव करायचा कुठे, हा प्रश्न भेडसावत असल्याचे “संवाद’चे सुनील महाजन यांनी सांगितले.
बहुपडदा चित्रपटगृहांचे भाडे परवडणारे नसल्याने या वर्षी बालचित्रपट महोत्सवाऐवजी बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्याचा विचार सुरू केल्याचे महाजन म्हणाले.
दरम्यान, बालचित्रपटांसाठी पडदाच उपलब्ध नसल्याने अनेक मुलांबरोबरच पालकही नाराजी व्यक्त करीत आहेत. शहरात नाराजीचा सूर उमटत आहे.
बालचित्रपट महोत्सव होऊ शकला असता, तर या उपक्रमाचा यंदा रौप्यमहोत्सव साजरा झाला असता. बहुपडदा चित्रपटगृहाचे भाडे परवडणारे नाही. त्यामुळे नाईलाजास्तव बालचित्रपट महोत्सव बंद करावा लागत आहे. मात्र, बालचमूंच्या मनोरंजनासाठी या वर्षी बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्याचा मानस आहे.
– सुनील महाजन,
अध्यक्ष, संवाद, पुणे