खालापूर – खालापूर तालुक्यातील ईसाळवाडी या दुर्गम भागातील रायगड जिल्हा परिषदेची शाळा गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. पटसंख्येचे कारण देत ही शाळा बंद केल्याने दुर्गम भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
एकीकडे “पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया’ अशी जाहीरात सरकार करीत आहे. तर दुसरीकडे पटसंख्येचे कारण देत शाळा बंद करीत आहेत. त्यामुळे “स्कूल चले हम’ असे म्हणण्या ऐवजी “घर चले हम’ असे म्हणण्याची वेळ ईसाळवाडी येथील विद्यार्थ्यांवर आली आहे. खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात डोंगराच्या पायथ्याशी ईसाळवाडी येथे रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये जवळपास 15 मुले प्राथमिक शिक्षण घेतात. ईसाळवाडीत अवघी 40 घरे असल्याने येथील लोकसंख्याही कमी आहे. हा भाग दुर्गम असल्याने येथे शिक्षक येण्यास तयार नसतात. त्यातच पटसंख्येचे कारण देत जिल्हा परिषदेने येथील शाळा आठ महिन्यांपूर्वी बंद केली.
ईसाळवाडी पासून चार किलोमीटर अंतरावर “चौक’ या बाजारपेठेच्या ठिकाणी जिल्हा परिषदेची दुसरी शाळा आहे. मात्र दररोज आठ किलोमीटर मुलांना चालत नेणे-आणणे पालकांना शक्य होत नाही. यामुळे ही मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्याने येथील पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पावसाळ्यात तर या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होतात. ईसाळवाडी येथील प्राथमिक शाळा सुरु पुन्हा करण्यासाठी पालकांनी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र त्यांच्या पदरी निराशेशिवाय काहीच पडले नाही. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच विद्यार्थी चौक येथे शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. तर काहींना आश्रम शाळेत टाकण्यात आले आहे. आपल्या मुलांना शालेय शिक्षण मिळावे, त्यांनी अशिक्षित राहु नये, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. विद्यार्थ्यांना गावातच प्राथमिक शिक्षण मिळाल्यास येथील मुले शाळेपासून वंचित राहणार नाही, अशी भावना काही पालकांनी व्यक्त केली.
“ईसाळवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा सुरु झाली असती तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नसते. यामुळे नाइलाजाने आम्हाला माणगाव, चिखले, पनवेल येथील आश्रम शाळेत मुलांना पाठवावे लागत आहे. मुले डोळ्यासमोर नाहीत ही खंत मनाला लागून राहत आहे.
– जगदीश पारधी, पालक ईसाळवाडी