सध्या माहितीचा अतिरेक होत असताना, उपलब्ध माहितीच्या आधारे आपण योग्य तो निर्णय घेताना मन स्थिर का ठेवावे, नेमके याच विषयी थोडेसे…
सध्याचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. आपल्याला हवी असलेली माहिती त्वरित उपलब्ध होत असते. तीव्र गतीने माहिती अनेकांपर्यंत पोहोचते. हा माहितीचा वणवा एवढा मोठा असतो की आपल्यापासून हजारो किमी अंतरावर घडलेल्या घटनेचा पडसाद आपल्यापर्यंत पोहोचतात आणि परिणामही करतात.
याच माहितीचा आपण दैनंदिन जीवनात उपयोग करून आपले जीवन सुकर करीत असतो. तसेच आपण आपले जीवन सुरक्षितही करीत असतो. याच माहितीच्या आधारे अनेक गुन्ह्यांचा तपास करणे सुकर झालेले आहे. याच माहितीच्या महासागरात आपल्याला काही चुकीची माहितीही मिळू शकते. कुणी आपली दिशाभूलही करू शकते. यातूनच सायबर गुन्हे घडत आहेत, पण आपण आपल्या ज्ञानाचे कवच जर परिधान केलेले असेल तर अशी खोटी माहिती देऊन आपल्यावर होणारे हल्ले परतवून लावू शकतो. आपण ज्ञानाच्या कसोटीवर जर मिळालेली माहिती घासून पाहिली तर जे समोर येईल त्याप्रमाणे आपण पुढील कृती करावयाची. पुढील कृती करण्यास आपल्याला मनोबल मिळते ते ज्ञानामुळेच. त्यामुळे आपण आपल्या निर्णयावर ठाम राहू शकतो.
न भूतपूर्वो न च केनन दृष्टो हेम्नः
कुरो, न कदापि वार्ता।
तथापि तृष्णा रघुनन्दनस्य,
विनाशकाले विपरीतबुद्धिः।।
(स्थूलार्थ : सोन्याचे हरीण ही गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती, कुणीही तसे हरीण पाहिलेले नव्हते, इतकेच काय पण असे काही अस्तित्वात असल्याचे ऐकलेही नव्हते. असे असूनही रामाच्या मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. त्यामुळेच तर सारा अनर्थ घडून रावणाने सीतेला पळवून नेले व सारे रामायण घडून गेले. खरोखर माणसाचा नाश होण्याची वेळ जवळ आली की, त्याची बुद्धीसुद्धा भ्रष्ट होते आणि सारासार विचार करण्याची त्याची शक्तीच नाहीशी होते.)
आपल्याला जर कोणी काही एखादा आकर्षक प्रस्ताव सादर केला, तर तो फसवा असण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रस्तावात आपल्याला भरपूर नफा असलेला दिसतो, पण प्रस्ताव देणाऱ्याचा फायदा कोठे आहे आपण विचारच करत नाही. कुणी काही फुकट काम करत नाही. हे फायद्याचे गणित जर कुठे चुकीचे वाटत असेल तर आपण तो प्रस्तावच नाकारावा. नाहीतर आपली रावणासारखी परिस्थिती होऊ शकते.
हे सर्व टाळण्यासाठी आपले मूलभूत ज्ञान पक्के व खात्रीशीर असणे आवश्यक आहे. त्यामुळे जे ज्ञान आपल्याकडे आहे त्या ज्ञानावर आपण मिळालेली माहिती खरी-खोटी करून आपले मत ठाम करू शकतो. अशा ठाम मतावर आपण आपण पुढील वाटचाल यशस्वीपणे करू शकतो.
ज्यावेळी आपल्याकडे काही माहिती येईल त्याबाबत जर काही अपुरी किंवा काहीच माहिती नसेल तर अधिकृत स्रोतातून आपण पुन्हा खात्री करून घ्यावी. एकाच स्रोतातून नव्हे दोन-तीन स्रोतांतून माहिती घ्यावी. जर सगळीकडे समानता आढळली तर ठीक नाहीतर प्रथम मिळालेली माहिती चुकीची आहे असे समजून त्याप्रमाणे पुढील कृती करावी.
परदेशात ज्ञान हाच आपला साथी असतो. (येथे परदेशात म्हणजे आपल्याला असणाऱ्या अपरिचित वातावरण असा स्थूलार्थ गृहीत आहे.) आपण आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवणे, सतत नव नवीन क्षेत्रातील माहिती मिळवीत राहणे, कान व डोळे उघडे ठेवून जगात वावरणे आवश्यक असते. आपण प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ होऊ शकत नाही पण अनेक क्षेत्रातील थोडीफार माहिती घेऊन ठेवू शकतो. बऱ्याच वेळा आपल्याला नवीनच काही प्रस्ताव येतो. तो चुकीचा किंवा बरोबर हे ठरविण्यासाठी आपण जरी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसलो तरी आपल्याकडील ज्ञानामुळे, माहितीमुळे काही सारासार विचार करू शकतो. यामुळेही आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. सारासार विचार करण्याची आपली हीच पात्रता आपल्याला परदेशात फार उपयोगी पडू शकते.
कोणी आपल्याला कोणता एखादा निर्णय घेण्यासाठी कृत्रिम घाई करीत असेल तर नक्की काही तरी चुकीचे होत आहे याची खात्री बाळगावी. ती व्यक्ती आपल्याला विचार करण्यासाठी जास्त वेळ देऊ इच्छित नाही. कारण आपण विचार करायला लागलो तर त्या व्यक्तीचा धूर्तपणा लक्षात येईल, या भीतीने ती व्यक्ती कृत्रिम घाई करीत असते. याशिवाय आणखी एक युक्ती वापरली जाते ती म्हणजे आपल्यासमोर इतकी माहिती ओतली जाते की आपण भांबावून जातो. अशा प्रसंगी आपण आपणास आवश्यक तो वेळ घेऊ शकतो आणि आपणाशी संबंधित तेवढीच माहिती विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेऊ शकतो.
आपण कोणास काही माहिती देत असू, सल्ला देत असू अशा वेळी एक जबाबदार व्यक्ती म्हणून खरी, योग्य तीच माहिती द्यावी. बऱ्याच वेळा आपण ऐकीव माहिती खात्रीशीर व खरी आहे असे छातीठोकपणे आपण सांगत असतो. किंवा आपला काही अंदाज असतो, किंवा अमुक एक घडावे असे आपणास मनापासून वाटत असते, त्याप्रमाणे दुसऱ्याला काही सांगत असतो. आपल्या भरवश्यावर दुसरा कोणी काही निर्णय घेणार असतो. तो चुकीचा निर्णय घेऊन बसतो. नेमके हेच उलटे आपल्याबाबतीतही घडू शकते. हे दुष्ट चक्र खंडित करण्याची सुरुवात आपणापासून करावयाची. आपणास खात्रीशीर असलेलीच माहिती द्यावयाची. आपला काही अंदाज असेल तर तशी स्पष्ट कल्पना माहिती देताना द्यावी.
सध्याच्या युगात आपल्या प्रत्येक हालचालीवर कोणाचेतरी आपल्यावर बारीक नजर आहे. आपल्या प्रत्येक कृतीची नोंद कुठेतरी ठेवली जात आहे. आपण या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपली कोणती माहिती सार्वजनीक करावी व कोणती व्यक्तिगत ठेवावी याचा निर्णय आपणच घ्यावा. आपल्या हातातील भ्रमणध्वनी संच हाच आपल्याला बाह्य जगाशी सर्व मार्गांनी जोडणारा दुवा आहे. भ्रमणध्वनी रुपी हे दार केव्हा उघडे ठेवायचे आणि केव्हा बंद ठेवायचे हे आपल्याच हातात आहे. तसेच दारावर आलेल्या व्यक्तीला आत प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवायचे आहे. कारण कोणीतरी उघड्या दारातून अचानकपणे आत येऊन हल्ला करू शकते. म्हणून आपण कुठेही कमजोर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपले मन स्थिर ठेवून समोर आलेल्या माहितीकडे बघावे. यामुळे आपण आपोआपच सुरक्षा कवच परिधान करतो. अशा कवचामुळे आपली विनाशकाली विपरीत बुद्धी होत नाही कारण आपली मनोदेवता आपल्या पाठीशी सदैव आपले रक्षण करण्यास उभी आहे.
– अनिकेत भालेराव