मंचर -महाळुंगे पडवळ, कळंब, लौकी, एकलहरे, चांडोली, गावडेवाडी, अवसरी (ता. आंबेगाव) आदी गावांतील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून चिक्कूच्या बागा फुलविल्या आहेत; पण कष्टाने पिकवलेल्या या फळबागा लॉकडाऊनमुळे मातीमोल झाल्या आहेत. पिकलेले चिकू जमिनीवर गळून पडून सडू लागल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून योग्य न्याय व आर्थिक मदत दिली पाहिजे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. व्यापारी बागेतून माल घेऊन जात नाहीत तर बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहक नाही. अशा स्थितीत फळबागेतील फळे गळून जात आहेत.
पिकलेले चिकू तोडून स्वतः विकायचे झाले तरी तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत. हा माल नाशवंत असल्याने अनेक शेतकरी कशीबशी स्वतः च तोडणी करून गावोगावी जाऊन विक्री करीत आहेत, अशी माहिती महाळुंगे पडवळ येथील शेतकऱ्यांनी तबाजी पडवळ व तानाजी गव्हाणे यांनी दिली. करोनामुळे सर्व बाजूने शेतकरी अडचणीत सापडल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शासकीय नियमावलीत बागायतदार शेतकऱ्यांना विशेष सवलत मिळेल का, नुकसान भरपाईची मदत होईल का, पीक विमा कंपन्या मदतीला धावतील का, सरकार व प्रशासनाने यावर सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देईल का, या विचाराने बळीराजाला ग्रासले आहे.
– दत्तात्रय भालेराव, शेतकरी, कळंब