मुंबई: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने आत्तापर्यंत 27 हजार 865 मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च उचलून त्यांना त्यांच्या राज्यात पोहचवले आहे अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. या खेरीज अन्य 24 हजार मजुरांनाही त्यांच्या गावी पोचवण्यासाठी नियोजन केले जात आहे असे त्यांनी नमूद केले आहे.
रेल्वे किंवा अन्य प्रवासी साधने उपलब्ध होत नसल्याने हे परप्रांतीय मजुर चालत आपल्या गावी निघाले होते. त्यांच्याकडे रेल्वेच्या प्रवासाचे पैसेही नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची खर्च कॉंग्रेस पक्षातर्फे उचलण्याची घोषणा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. त्यांच्या सुचनेनुसार प्रदेश कॉंग्रेसने ही जबाबदारी उचलली. थोरात यांनी सांगितले की आम्ही जिल्हा पातळीवरच या मजुरांची नाव नोंदणी करून त्यांच्यासाठी विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्या आणि त्यांना त्यांच्या राज्यात रवाना केले.
त्यांच्यासाठीच्या श्रमिक स्पेशल ट्रेन्स मुबंई, नागपूर, वर्धा, पुणे अहमदनगर, मीरज, चंद्रपुर इत्यादी ठिकाणांवरून सोडण्यात आल्या आणि या मजुरांना मुज्जफरपूर, लखनौ, बलिया, पाटणा, दरभंगा, भोपाळ, गोरखपुर येथील स्थानकांवर पोचवण्यात आले आहे. या मजुरांना तिकीट खर्चा सहित त्यांच्या जेवण व मास्क, सॅनिटायझरचीही सोय प्रदेश कॉंग्रेसने करून दिली आहे असेही त्यांनी सांगितले.
राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चार गाड्यांच्या प्रवासाचा खर्च उचलला तर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि सुनील केदार यांनी दोन रेल्वे गाड्यांचा खर्च उचलला. विजय वडवेट्टीवार आणि यशोमती ठाकूर या मंत्र्यांनीही यासाठीच्या खर्चाचा भार उचलला असे त्यांनी सांगितले. त्याखेरीज 3567 मजुरांना खासगी वाहनातून राज्याच्या विविध भागात पोहचवण्यात आले आहे. त्याचाही खर्च प्रदेश कॉंग्रेसने उचलल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरातून परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांच्या जेवणाचा भार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उचलला. जिल्हा कॉंग्रेसने सुरू केलेल्या हेल्प लाईनवर अजून 24 हजार परप्रांतीयांनी नाव नोंदणी केली असून त्यांचाहीं खर्च प्रदेश कॉंग्रेसतर्फे केला जाईल असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.