मुंबई – बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी हालचाली सुरु असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत भाष्य करताना राज्यात यासाठी १००० एकर जागा उपलब्ध केल्याचं सांगत फिल्मसिटी उभारणार असल्याचं जाहीर केलं होत. अशातच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘क्षमता असेल तर त्यांना फिल्मसिटी नेऊ द्या, आम्ही मात्र, दर्जात्मक आणि राज्याच्या निर्मिती सुविधांवर भर देणार आहोत,’ अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला.
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारणार
सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मनोरंजन हे एकमेव असे माध्यम आहे जिथे आपण आपले दु:ख काही वेळाकरिता का होईना विसरुन जातो. मनोरंजन क्षेत्र मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे काम करीत असते. या क्षेत्रामुळे एक चांगला समाज घडण्यास मदत होत असते. त्यामुळेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्राचा आनंद घेता यावा यासाठी ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल.
राज्य शासनाचा एखादा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकार हे एक उत्तम माध्यम आहे. कारण जनमानसात कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांच्या मनातील स्थान असते. त्यामुळे महाराष्ट्रातील कलाकारांच्या पाठिशी राज्य शासन कायम उभे असून कलाकारांना बळ देण्याचे काम करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.