जळगाव – भाजपच्या महाभरतीवर बोलण्यापेक्षा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने महागळतीची चिंता करावी, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. शरद पवार आणि अशोक चव्हाण हे दोघेही भाजपमधल्या महाभरतीवर बोलत असतात. आधी या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाला लागेल्या महागळतीची चिंता करावी, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
जळगावच्या सागरपार्क मैदानावर आयोजित महाजनादेश यात्रेच्या सभेत त्यांनी ही टीका केली. या सभेला माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपातल्या दिग्गजांची उपस्थिती होती.
सध्याच्या घडीला राज्यातले सगळे प्रश्न सुटले, सगळ्या समस्या मार्गी लागल्या असा माझा दावा नाही. मात्र शेतकरी, सामान्य वर्ग नागरिकांच्या हिताचे अनेक प्रश्न युती सरकारने सोडवले आहेत. हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवणारे सरकार आहे, असा विश्वास आम्ही निर्माण केला आहे. त्यामुळे आम्हाला लोक निवडून देत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
ईव्हीएमबाबत शंका व्यक्त करणाऱ्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. 2004 ते 2014 पर्यंत केंद्रात आणि राज्यात आघाडीचेच सरकार होते. त्यांना ईव्हीएमद्वारेच मतदान करण्यात आले. आताच नेमके ईव्हीएमवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत? असाही प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.