आ. मकरंद पाटील : कवठे येथे किसन वीर यांची जयंती साजरी
कवठे – सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस उभी करण्याचे काम माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांनी केले होते. जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचो. सध्याच्या राजकारणात पक्ष अडचणीत आहे. देशभक्त किसन वीर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी पुन्हा भक्कम करायची सुरुवात करू या, असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले.
कवठे, ता. वाई येथे देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांची 114 व्या जयंती आणि सातारा येथे येत असलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या नियोजन कार्यक्रमात बोलत होते. आ. मकरंद पाटील म्हणाले, किसन वीर यांनी शंकरराव जगताप,भाऊसाहेब गुदगे, सदाशिवराव पोळ, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, विलासराव उंडाळकर या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना आमदार केले. आबांच्या स्मृती विसरता येणार नाहीत.
ज्यांना शरद पवारसाहेबांनी भरभरून दिले, तेच आज त्यांचा विचार सोडून जात आहेत. राज्यात कुठल्याही आपत्तीत पवारसाहेब सर्वात प्रथम पोहोतात तर आताचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर दौरा करून गेले, यावरून नेत्याचे गुणविशेष कळतात. जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हा मजबूत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी 28 ऑगस्टला सातारा येथे येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेसाठी कार्यकर्त्यांनी हजर राहावे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, किसन वीर यांच्या जन्मदिनी शिवस्वराज्य यात्रेसंदर्भात पहिली सुरुवात झाली असून उद्याच्या महाराष्ट्रात सातारा क्रांती घडवेल. हे राज्य छत्रपती शिवराय, किसन वीर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे असावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मकरंद पाटील व शशिकांत शिंदे हे शिलेदार आहेत तोपर्यंत जिल्ह्याच्या हा गड राखलाच जाईल.
दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आ. मकरंद पाटील यांचा, ज्ञानदीप स्कूलच्या अध्यक्षपदी कवठे येथील दिलीप चव्हाण यांची तर ज्ञानदीप पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रतापराव पवार, दत्तानाना ढमाळ, बाळासाहेब सोळसकर, शशिकांत पिसाळ, मंगेश धुमाळ, संगीता मस्कर, रजनी भोसले, मकरंद मोटे, हणमंत शेवाळे, दिलीप पिसाळ, मनोज पवार, शारदा ननावरे, उमा बुलंगे, प्रमोद शिंदे, मनीषा शिंदे, मोहन जाधव, अनिल जगताप, प्रकाश चव्हाण, महादेव मस्कर, शशिकांत पवार, लक्ष्मणराव पिसाळ, संजय साळुंखे, राहुल डेरे, सत्यजित वीर, कृष्णराव डेरे, लक्ष्मण पोळ, श्रीकांत वीर, शिवाजी करपे, संदीप डेरे, उज्ज्वला पोळ, राजेंद्र पोळ, शशिकांत करपे, माधवराव डेरे उपस्थित होते.
रॅपर बदललंय, चॉकलेट तेच
खंडाळा राष्ट्रवादीतून बरेच जण बाहेर पडल्याची चर्चा असली तरी त्याची काळजी कुणी करू नये. कुणी भाजपमध्ये गेले असले तरी रॅपर बदललंय, पण आतलं चॉकलेट तेच आहे. त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही. पुढील दोन महिने कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे व विजयाची खात्री बाळगावी, असे आ. पाटील म्हणाले.