रांची – झारखंड मधील चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या सरकारचा विश्वास दर्शक ठराव जिंकला आहे. या मतदानात सरकारच्या बाजूने 47 मते पडली तर विरोधात केवळ 29 आमदारांनी मतदान केले. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या जागी चंपाई सोरेन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना दहा दिवसांच्या आत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपालांनी दिला होता.
आजच्या मतदानाच्यावेळी विधानसभेतील 81 आमदारांपैकी 77 सदस्य उपस्थित होते. झारखंड मुक्ती ममोर्चाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॉंग्रेस व राजद हे पक्षही सामील आहेत. कम्युनिस्ट पक्षाचा सरकारला बाहेरून पाठींबा आहे. आपल्या आमदारांची भाजपकडून शिकार होण्याची शक्यता सत्ताधारी आघाडीने व्यक्त केली होती म्हणून या आमदारांना हैदराबाद येथे ठेवण्यात आले होते. हे आमदार काल कडक बंदोबस्तात रांचीत दाखल झाले या आमदारांनी आज पुर्ण संख्येने सभागृहात हजर राहून सरकारच्या बाजूने मतदान केल्याने या सरकारवरील अस्थिरतेचे सावट दूर झाले आहे.
आजच्या मतदानाच्यावेळी अटकेत असलेले हेमंत सोरेन यांनाही विधानसभेत उपस्थित राहुन मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने भाषण करताना त्यांनी भाजपवर जोरदार आगपाखड केली. ते म्हणाले की माझ्या विरोधातील अटकेच्या कारवाईची सूत्रे दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्याने राजभवनातून हलवण्यात आली. आपल्या सरकारला चारही बाजूने घेरण्यात आले आणि आपल्यावर खोट्या आरोपांखाली कारवाई करण्यात आली. आपण केवळ अदिवासी आहोत म्हणून माझ्या पंचतारांकित हॉटेलातल्या वास्तव्याला आणि मी ज्या कार मधून फिरतो त्यालाही आक्षेप घेतला गेला.
माझ्यावर मोठी जमीन बळकावल्याचा आरोप केला गेला पण हा आरोप सिद्ध झाल्यास आपण राजकारणच काय झारखंड प्रदेशही सोडून जाऊ असा दावा त्यांनी केला. दरम्यान मुख्यमंत्री चंपाई सारेन यांनी हेमंत सोरेन सरकारचा कार्यक्रम वेगाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपले सरकार हे हेमंत सोरेन यांच्याच सरकारचे भाग दोन म्हणून काम करेल असा दावा त्यांनी केला. या विश्वासदर्शक ठरावाच्या विजयानंतर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रांचीत जल्लोष साजरा केला. भाजपला आम्ही यानिमित्ताने मोठी चपराक दिली आहे, सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आहे, अशा प्रतिक्रीया सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी दिल्या आहेत.