औरंगाबाद – आम्ही भाजपची बी टीम नाही. भाजपला रोखण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत असं विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ निर्माण झाला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएमवर कडाडून टीका केल्यानंतर जलील यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं.
भारतात आणि महाराष्ट्रात राहणारे सर्व मुस्लीम शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना आदर्श मानतो. त्यांची मक्तेदारी फक्त तुमची नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी करता, असा आरोप जलील यांनी केला. तसेच औरंगजेब कोणत्या काळात होता आणि आजचा काळ काय आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं, अशा भाषेत जलील यांनी राऊतांना सुनावलं.
मुळात शिवसेनेचा जन्म काँग्रेसच्या विरोधातून झाला होता. मात्र आता सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत घरोबा केला. सत्तेसाठी तुम्ही किती खालच्या पातळीवर जावू शकता हे दिसून येतं, असं जलील यांनी म्हटलं.
दरम्यान तुम्ही आम्हाला उपदेश देणार असाल तुमच्यासाठी शिवाजी महाराज किती महत्त्वाचे आहेत, हे जनतेला कळलं आहे. आम्ही किमान तुमच्यासारखा शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला नाही, असा टोला जलील यांनी शिवसेनेला लगावला.