मागील दोन-तीन दिवस राजकीय नेत्यांच्या तोंडी चित्ते, कबूतर आणि पेंग्विन हे शब्द होते. हे राजकारणाचे रण आहे की पक्षी, प्राण्यांचे वन असेच कुणालाही वाटावे. महागाई, बेरोजगारी आणि इतर समस्यांनी त्रस्त असणाऱ्या सामान्य जनतेला न दिसलेले अच्छे दिनच जणू संबंधित पक्षी-प्राण्यांना आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवशी भारतातून नामशेष झालेले चित्ते देशाच्या भूमीत सोडले. त्यासाठी मोदींच्या खास स्टाईलला शोभणारा विशेष शो झाला. तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्त्यांचे आगमन ही खरेतर आनंददायी आणि चांगली घडामोड. पण, चित्ते सोडल्यानंतर स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी आधीच्या सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा मोह मोदींना आवरला नाही. चित्ते नामशेष झाल्यानंतर प्रदीर्घ काळ त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न झाले नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली. आधीच्या काळात माजी पंतप्रधानांकडून कबूतरं सोडले जाण्याच्या कृतीचाही त्यांनी उल्लेख केला. आधी कबूतरं सोडली जायची. आता चित्ते सोडले जात आहेत. देश बदलत आहे, असे मोदी यांनी म्हटले.
मोदींची ती वक्तव्ये देशात प्रदीर्घ काळ सत्तेवर राहिलेल्या कॉंग्रेसला रूचणे शक्यच नव्हते. त्यातून चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी आधी प्रयत्न झाले नसल्याचा मोदींचा दावा खोडून काढण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश पुढे सरसावले. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना 2009 मध्ये चित्ते आणण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्याचे काही पुरावेच त्यांनी दिले.
चित्त्यांवरून सत्ताधारी भाजपवर पलटवार करण्याची नामी संधी साधली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी. मुंबईत शिवसेनेच्या पुढाकारातून पेंग्विन दाखल झाले. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील भाजप नेते सातत्याने शिवसेनेची खिल्ली उडवण्याच्या हेतूने त्या पक्षासाठी पेंग्विनसेना असा शब्दप्रयोग वापरतात. त्याचा संदर्भ देऊन उद्धव यांनी उपरोधिक टिप्पणी केली. आम्ही पेंग्विन आणले म्हणून आम्हाला पेंग्विनसेना म्हणतात. त्यांनी आणलेल्या चित्त्याला इंग्रजीत चिता म्हणतात.
आता त्यांच्या सरकारला चिता सरकार म्हणायचे का, असा सवाल उद्धव यांनी केला. त्यानंतर उद्धव यांच्या टिप्पणीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शाब्दिक प्रहार केला. चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं. पण, काही लोकांना चांगलं बोलता येत नाही, असे राणे म्हणाले. राणे यांचा तो युक्तिवाद भाजप नेत्यांनाही लागू होण्यास हरकत नाही. आणखी काही काळ राजकारणात संबंधित पक्षी, प्राणी ठाण मांडून बसण्याची शक्यता आहे. खरेतर, जनतेशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा, वाद होण्याची गरज आहे. पण, राजकीय नेते भलत्याच मुद्द्यांकडे लक्ष वळवण्यात धन्यता मानताना दिसतात.