औरंगाबाद : शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद मिळविले. पण भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव जमली की सरकार बरखास्त होईल. त्या दिवशी एकनाथ शिंदे यांना कळेल की आपण किती मोठी चूक केली. हे सरकार टिकणार नाही, म्हणूनच प्रशासनसुद्धा सरकारचं ऐकत नाही. या सरकारची प्रशासनावरची पकड मजबूत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधला.
सध्या जयंत पाटील हे मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज औरंगाबाद शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. सोबतच शिंदे-फडणवीस सरकार कधीही बरखास्त होईल, असा दावा त्यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त 40 मतदारसंघपुरत्या विविध घोषणा करीत आहेत. उरलेल्या मतदारसंघाचे काय? कोणत्याही घोषणेचे जीआर नाहीत किंवा आदेशही नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिखित भाषण वाचतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीबद्दल स्थानिक नेत्यांना कॉंग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. तिन्ही पक्ष कुठं एकत्रित लढतील याबद्दल स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.