पुणे- -बहुतांश अन्नधान्यांच्या भावात वाढ होत असताना खाद्यतेलाने मात्र सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल, पाम, सोयाबीन, सरकी तेलाच्या भावात 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे भाव मात्र टिकून आहेत. गेल्या वर्षी दिवाळीत खाद्यतेलांचे भाव तेजीत होते.
यंदा मात्र परदेशांतून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात टप्प्याटप्प्याने घट झाली. या स्थितीमुळे दिवाळीत गृहिणींना दिलासा मिळाला आहे, असे निरीक्षण मार्केट यार्डातील चिमणलाल गोविंददास पेढीचे भागीदार, खाद्यतेल व्यापारी कन्हैयालाल गुजराती यांनी दिली.
खाद्यतेलांचे 15 किलोचे दर (कंसात गेल्या वर्षीचा भाव-रुपयांत)
- पाम 1,350 ते 1,500 (2,100 ते 2,150)
- सूर्यफूल 1,400 ते 1,500 (2,300 ते 2,400)
- सोयाबीन 1,400 ते 1,500 (2,300 ते 2,400)
- सरकी 1,400 ते 1,500 ( 2,200)
- वनस्पती तूप 1,400 ते 1,600 (1,900 ते 2,000)
- शेंगदाणा 2700 ते 2800 (2,800 ते 2,900)
केंद्र सरकारकडूनही दिलासा
पामतेलाची आयात मलेशिया, इंडोनेशियातून केली जाते. सोयाबीन तेलाची आवक दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनातून होते. रशिया- युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आवक होते. गेल्या वर्षी खाद्यतेलांच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्या वेळी केंद्र शासनाने देशातील प्रमुख तेलआयातदारांना 20 लाख टन तेलाच्या आयातीवर आयातशुल्क माफ केले होते. यामुळे तेलभावात घट झाली. तसेच जागतिक बाजारपेठेतून खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत झाला आहे.
“दिवाळीत पूर्वी घरगुती ग्राहकांकडून खाद्यतेलाला जास्त मागणी असायची. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. गृहिणी बाजारपेठेतून तयार फराळाचे पदार्थ खरेदी करतात. त्यामुळे मिठाईविक्रेते, फराळ तयार करणाऱ्यांकडून खाद्यतेलांला जास्त मागणी आहे.” – कन्हैयालाल गुजराती, खाद्यतेल व्यापारी, मार्केट यार्ड