कालव्यालगतच्या शेतात पाण्याचे तळे : ऊस, कांदा पिके कुजू लागली
– विशाल वर्पे
केंदूर – चास कमानच्या कालव्यातून सुरू असलेल्या पाण्यामुळे कालव्यालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाझरलेले पाणी साचल्याने पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चास कमानच्या डाव्या कालव्यातून तब्बल पाचशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर पावसाचे प्रमाणही यावर्षी अधिक असल्यामुळे कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकामध्ये पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कालव्याच्या बाजूच्या शेतात ऊस आणि कांदा ही दोन पिके प्रामुख्याने घेतली जातात. मात्र, पाझरलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नुकसान झाल्याने शेतकरी कालव्याचे पाणी कमी करून पर्यायी मार्गाने नदीत सोडण्याची मागणी करीत आहेत. बाधीत पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत.
कालव्याच्या बाजूच्या गावांना करंदी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, मुखई गावांतील तब्बल दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरातील अंदाजे दीड ते दोन हजार हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त उसाच्या पिकाला फटका बसला आहे. तरकरी पिकांना देखील याचा फटका बसल्याने महसूल प्रशासनाने लवकर पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
दिवसेंदिवस नापिकीचे प्रमाण वाढत असताना त्यात वेळप्रसंगी गरज असताना शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यावर्षी मात्र चास कमानचे पाणी गेली दोन महिन्यांपासून सुरू आहे. ते पाणी पर्यायी मार्गाने नदीला सोडावे, ही मागणी जोर धरू लागली आहे.केंदूरच्या पऱ्हाडवाडी भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतजमीनी पाझरून त्याठिकाणी कांद्याचे नुकसान झाले आहे. पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
दोन दिवसांपूर्वी विसर्ग कमी करून 150 क्युसेकने केला होता. मात्र, पुन्हा धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने विसर्ग वाढवून 480 करण्यात आला आहे. नदीत पाणी सोडण्याची पर्यायी सूचना लवकरच वरिष्ठांना कळवणार आहे.
– सचिन शिंदे, शाखा अभियंता, चासकमान विभाग, खेड.
पाण्याचा विसर्ग कमी करून पर्यायी मार्गाने अतिरिक्त पाणी नदीत सोडायला पाहिजे. त्याचप्रमाणे पाझरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
– विकास दरेकर, अध्यक्ष, क्रांती युवा संघटना.