मुंबई – पुण्यातील इसिस मॉड्युलप्रकरणी दहशतवादी हल्ले घडविण्याच्या कटात सहभागी असलेल्या सात जणांविरुद्ध आज आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दहशतवाद आणि हिंसाचाराशी संबंधित कारवायांसाठी निधी गोळा करणे, वॉन्टेड दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि सुधारित स्फोटके तयार करण्यासाठीची पूर्वतयारी केली जात असल्याचेदेखील आढळून आले आहे.
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी, कदीर दस्तगीर पठाण, सीमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमील साकिब नाचन आणि आकीफ अतीक नाचन अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कायद्यांर्तगत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. तसेच एनआयएने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या प्रकरणात आयएसआयएस
हॅंडलर्सचा सहभाग असल्याचे उघड करण्यात आले आहे.
देशात इसिसच्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क देखील या तपासात उघड झाले आहे. हे आरोपी त्यांच्या दहशतवादी योजना आणि योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी भारतात आणि परदेशातून विविध स्त्रोतांकडून निधी गोळा करत असल्याचेही आढळून आले आहे. विशेष म्हणजे एनआयएने 8वा आरोपी मोहम्मद शाहनवाज आलम मुलगा शफिउर रहमान आलम याला 2 नोव्हेंबर रोजी नियुक्त विदेशी दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभागासाठी अटक केली होती.
हिजबुलच्या 17 जणांवरही आरोपपत्र
राष्ट्रीय तपास संस्थेने हिजबुल-उल-तहरीर या दहशतवादी संघटनेशी संबंधित 17 आरोपींविरुद्धही आज आरोपपत्र दाखल केले आहे. मोहम्मद आलम, मिसबाह उल हसन, मेहराज अली, खालिद हुसैन, सय्यद सामी रिझवी, यासिर खान, सलमान अन्सारी, सय्यद दानिश अली, मोहम्मद शाहरुख, मोहम्मद वसीम, मोहम्मद करीम, मोहम्मद अब्बास अली, मोहम्मद हमीद, मोहम्मद सलीम, अब्दुर रहमान, शेख जुनैद आणि मोहम्मद सलमान अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मध्य प्रदेशात दहशतवादी संघटनेसाठी सदस्यांची भरती करत असल्याचे उघड झाले आहे. तसेच त्यांच्या गटातील सदस्यांना शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देत होते.