अक्षय हा शाळकरी मुलगा, नेहमीच गोंधळलेला दिसतो. तसं त्याला कामाचा उरक आहेच. सर्व कामे भरभर पूर्ण करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे, मात्र कोणतं काम आधी करावं आणि कोणतं काम नंतर करावं यामध्ये मात्र त्याचा नेहमीच गोंधळ उडालेला असतो. त्यामुळे अक्षयने कितीही कामे केली तरी त्याच्या कामांमध्ये चांगला प्रभाव दिसून येत नाही. कोणत्या कामाला महत्त्व द्यावे आणि कोणत्या कामाला महत्त्व देवू नये, कोणत्या कामाला वेळ द्यायचा आणि कोणत्या कामाला वेळ नाही दिला तरी चालेल याचं वर्गीकरण तो करू शकत नाही. त्यामुळे त्याला अनेक कामांमध्ये अपयश येते.
आपल्याला शालेय जीवनामध्ये चित्रांचा क्रम लावा, गोष्टींचा क्रम लावा, पुढची संख्या, मागची संख्या, आधीची घटना, नंतरची घटना अशा प्रकारच्या अनेक गोष्टीतून घटनांचा क्रम लावण्याविषयी शिकवण्यात आलेले आहे. म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अगोदर काय केलं पाहिजे, नंतर काय करावे याचं मार्गदर्शनच आपल्याला शालेय जीवनामध्ये झालेले असते. भविष्यामध्ये आपल्याला कामात प्राधान्य देता यावे याची ती पूर्वतयारीच असते. आपण आपल्या आयुष्यामध्ये करावयाच्या कामांना प्राधान्यक्रम ठरवूनच करावी लागतात. जर प्राधान्यक्रम ठरवला नाही तर अत्यंत कमी महत्त्वाच्या कामाला जास्त वेळ आणि अत्यंत महत्त्वाच्या कामाला कमी वेळ मिळतो आणि कामांमधले संतुलन ढासळते यामुळे एकंदरीतच अनेक कामांमध्ये अपयश येण्याचा संभव असतो. हे टाळायचे असेल तर सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे कामांना प्राधान्यक्रम देण्याचे शिकून घेणे.
हे आपणास कसे करता येईल? तर दररोज आपणास करावयाच्या कामाच्या प्राधान्याची यादी करावी. आपल्या कामाच्या प्राधान्याची यादी करता येणे हे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. तुमच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचे अनेक मार्ग असतात, त्यापैकी आपण कोणता निवडावा? तर ज्या मार्गाने आपला वेळही वाचेल आणि व्यवस्थितपणे कामही पूर्ण होईल असा मार्ग शोधणे कधीही हितावह असते. तातडीची कामे आणि महत्त्वाची कामे यामध्ये तुम्हाला फरक करता आला पाहिजे. काही कामे तातडीचे असतात मात्र ती कमी महत्त्वाची असू शकतात तर काही कामे महत्त्वाची असतात मात्र ती तातडीची असतातच असे नाही. त्यामुळे प्राधान्य नेमके कोणत्या कामाला द्यावे हे समजून येत नाही. यासाठी प्राधान्य चौकट वापरता येते. ही प्राधान्य चौकट आयसेनहॉवर मॅट्रिक्स म्हणूनही प्रसिद्ध आहे.
काम किती महत्वाचे आहे? अत्यंत महत्वाचे, 1. कृती- प्रथम करावे. (Do First). 2. कृती- नंतर करावे/ पुनर्नियोजन (Do Next). कमी महत्वाचे 3.कृती- नंतर करा/ इतरांना सांगा (Delegate), 4. कृती- कामच करू नका (Don’t Do), अत्यंत तातडीचे, कमी तातडीचे, काम किती तातडीचे आहे?
या चौकटीचा वापर करून आपण पुढील प्रमाणे आपल्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवू शकतो.
अ. चौकट 1- यामध्ये जास्त महत्त्वाची व अत्यंत तातडीची कामे येतात. ती आपणास प्रथम प्राधान्याने पूर्ण करावीच लागतात. याकडे दुर्लक्ष केल्यास आपले नुकसान होण्याचा धोका असतो.
ब. चौकट 2- यामध्ये जास्त महत्त्वाची मात्र कमी तातडीची कामे येतात. ही कामे आपण नंतर करू शकतो किंवा त्या कामाचे पुनर्नियोजन करून ती पूर्ण करावीत. ही कामे टाळता येणार नाहीत फक्त ती आपण नंतर करू शकतो.
क. चौकट 3- यामध्ये कमी महत्त्वाची मात्र अत्यंत तातडीची कामे येतात. ही कामे नंतर करावीत किंवा इतरांकरवी ही कामे करवून घ्यावीत. म्हणजे ही कामे करण्यास इतरांना तयार करावे.
ड. चौकट 4- यामध्ये कमी तातडीची आणि कमी महत्त्वाची कामे येतात. ही कामे न करता, तशीच सोडून द्यावीत.
वरील प्राधान्य चौकटीचा वापर तंतोतंत केल्यास आपले महत्त्वाची आणि तातडीची कामे करण्यास आपण प्राधान्य देऊन वेळेचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल. कधी कधी आपले प्राधान्य चुकले तर मात्र आपला वेळ वाया जाण्याचा जास्त संभव असतो. आपण नेहमीच चांगल्या कामासाठी प्राधान्यशील रहावे.