भाई आज विचारात पडला होता. अलीकडे तो अनेकदा असा विचारात पडायचा, पण उन्हाळ्यात पांढरे ढग आकाशात तरंगावेत, तसे त्याचे हे विचार असायचे. यायचे, काही वेळ तरळायचे आणि विरून जायचे. आकाशात त्यांचे नावनिशाणही राहायचे नाही. तोच प्रकार.
आपले केस पांढरे होऊ लागल्याचा तर हा परिणाम नाही ना, असे त्याला वाटायचे कधीकधी. “डाय” लावून पांढरे केस काळे केले, तरी ते वरवरचे. जगाला फसवण्यापुरते. आपण जगाला फसवले तरी मनाला फार काळ फसवू शकत नाही हे त्याला जाणवायचे. त्याच्या वडिलांनी कधी केसांना डाय लावला नाही. उलट पांढऱ्या केसांचा त्यांना मोठा अभिमान वाटायचा. ते त्यांच्या तरुणपणी, भाई शाळेत असताना जेवढे रुबाबदार दिसायचे, तेवढेच, किंवा काकणभर जास्तच रुबाबदार उतारवयात दिसू लागले होते; (सारा गाव त्यांना रावसाहेब म्हणायचा) चंदेरी केसांनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भरच घातली होते.
“आपण किती वर्षे डाय करत आहोत?’ भाई डोके खाजवू लागला. तीन दशके तरी झाली असतील. चारदोन केस करडे दिसू लागताच आपण डाय लावायला सुरुवात केली. एकदा सुरू केल्यावर डाय लावणे बंद करणे कठीण झाले. दर आठ-पंधरा दिवसांनी ते क्रियाकर्म करणे प्राप्त झाले. ते चालू असताना “आता कोण तुम्हाला बघायला येणार आहे?’ हे बायकोचे स्वगत बुटक्या फलंदाजाने बंपर “डक’ करावा तशा पद्धतीने तो कानाआड करत असे. आपले नाव राघव असले तरी त्या नावाचे गुण आपल्यात नाहीत याची त्याला आजवर कधी खंत वाटली नव्हती. त्या बाबतीत शालेय जीवनापासूनच तो अनुभवी झाला होता. एखाद्या पट्टीच्या गवयाने नवनवीन चिजा शोधाव्या, शिकाव्या; तसे तो नवनवीन अनुभव घेत राहिला. मिळतील तेथून. कोणतेही सोयरसुतक न बाळगता.
मुळातच तो खुशालचेंडू प्रवृत्तीचा होता. अगदी लहानपणापासूनच. एक तर घरात लाडका. त्याचे सारे काही चालवून घेतले जायचे आणि चालवून घेतले जायचे म्हणून तो चालवतच जायचा. चालता चालवता खूप पुढे गेला. न बदलण्याइतका. लहानपणी जसा खुशालचेंडू, तसाच शाळेत असतानाही. कॉलेजला असतानाही आणि पुढे संसारातही खुशालचेंडूच राहिला. जबाबदारी नावाचा शब्द त्याच्या जीवनात कधी डोकावलाच नाही. सारे काही आपोआप होत गेले. कधी आई-वडील रागावत, पण ते तात्पुरते. काही प्रकरणे तर मोठीच होती, पण त्यातही आई संतापली तर वडील सांगायचे, जाऊ दे गं; लहान आहे. अहो, आता चांगला दहा वर्षांचा झाला की, आता वीस वर्षांचा घोडा झाला की, आता तिशी झाली की, असे वयाचे संदर्भ बदलायचे. पण बाकी सगळे तसेच राहायचे. कधी सुधारणार हा? आई चिडून म्हणायची. पण वडील लक्ष देत नसत. मग आई त्याच्यासाठी उपासतापास, व्रतवैकल्ये करत राहायची. त्याच्यासाठी सोळा सोमवारचे व्रत केले तिने. अगदी कडक. तब्येतीवर परिणाम होईल इतके कडक. पण त्याचाही त्याच्या वागण्यावर फारसा परिणाम झालेला दिसला नाही.
आपला राग काही मिनिटांचा. हे आई-वडिलांना कळायचे आणि त्याला तर पक्के माहीत होते. तसा तो बेरकी होता. खुशालचेंडू असला तरी हिशोबी होता. पण त्याच्या स्वभावाचे हे कंगोरे फार उशिरा लक्षात आले सर्वांच्या. हरदासाच्या पायघोळ अंगरख्याप्रमाणेच भोळेपणाच्या बुरख्यात बरेच काही लपले जाते, लपवता येते. आजकाल मात्र भैयाच्या मनात कधीमधी वेगळे विचार डोकवून जायला लागले होते. निवृत्तीनंतर का होईना, त्याच्या मनात इतरांचे विचार डोकावू लागले होते. आपल्या वागण्याचा त्यावेळी आपल्या आई-वडिलांवर काय परिणाम झाला असेल याची झलक त्याला जाणवू लागली होती.
“तुम्ही आईबाप झाल्यावर कळेल, आईबापाची माया काय असते ते’ असे वाक्य त्याचे वडील अनेकदा अत्यंत तळमळीने उच्चारत. अगदी कळवळून. पण त्याला त्यातील तळमळ, कळवळा कधी जाणवलाच नव्हता. थोडासाही बोचला नव्हता. पण आता मात्र ते वाक्य मस्तकात कोणी घणाचे घाव घालावेत तसे त्याच्या मस्तकात आदळे. कारण त्याची मुले… मुलांची वागणूक त्याला आजकाल बोचू लागली होती. पण त्यांना रोखावे अशी काही त्याची हिम्मत होत नव्हती. बुमरॅंगसारखे आपले बोलणे आपल्यावर उलटेल अशी त्याला खात्री होती. आता मुले सहा आकडी पगार मिळवत होती.
भाईसमोर पैसा हा प्रश्न कधीच उभा राहिला नव्हता. आई-वडिलांच्या राज्यात नाही, आणि स्वत: कमवायला लागल्यावर तर अजिबात नाही. इंटरनॅशनल कंपनीत नोकरीला लागला. चिवटपणे घट्ट चिकटून राहिला. घरात पैसे देण्याची आवश्यकता नसल्याने व आई-वडील कधी मागत नसल्याने त्याला मौजमजेचा शौक लागला. तसा तो पूर्वीपासूनच होता. पण आता बेबंद झाला. आता मुले बेबंद झाल्यावर त्याचे डोळे उघडले. आपली भूमिका बदलली हे त्याच्या उशिरा लक्षात आले. पण तोपर्यंत त्याचे डायलॉग संपून गेले होते. मूकाभिनय उरला होता.
अश्विनी महामुनी