या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे… मंगेश पाडगावकरांच्या ओळी आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपण प्रत्येकजण आपापले जीवन जगत असतो. मात्र, प्रत्येकाची जगण्याची व्याख्या आणि उद्देश बरेचदा भिन्न असतो. कोणासाठी जगणे गाणे असते. कोणासाठी जगणे म्हणजे संघर्ष तर कोणासाठी जगणे ऊन सावलीचा खेळ असते. सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हाती आज स्मार्टफोन आलेला आहे. तसे पाहता व्यक्तीच्या हाती स्मार्टफोन आला आहे असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोनच्या हाती लागला आहे असे म्हणणे योग्य ठरेल. सध्याचे मानवी जीवन जगताना मूलभूत गरजांमध्ये स्मार्टफोन, इंटरनेट यांनी एव्हाना आपले स्थान भक्कम केले आहे. त्यातही स्मार्टफोनमधील सेल्फी आणि फोटोग्राफीने तर मानवी जीवनाला व्यापून टाकले आहे.
मुळात फोटो काढण्यात तसे काहीही गैर नाही. अविस्मरणीय क्षणांना, वेचक प्रसंगांना आणि सुखद आठवणींना फोटो रूपाने का होईना जपण्यात एक वेगळाच आनंद असतो. एक छंद किंवा आठवणींना उजाळा देण्यासाठी हे फोटो नक्कीच महत्त्वाचे ठरतात. परंतु प्रत्येक गोष्टीला नाण्याप्रमाणे दोन बाजू असतात. या बाजू फायदे आणि तोटे दर्शविणाऱ्या असतात. फोटो प्रेमाचा जेव्हा अतिप्रमाणात वापर होऊ लागतो तेव्हा मात्र याचे फायदे कमी अन् तोटेच अधिक दिसू लागतात. कारण या अतिवापराच्या व्यसनाने मर्यादा पार केलेली असते. जीवनाचे ध्येय अचानक बदलेले असते. दैनंदिन जीवनाच्या प्रायोरिटीज बदलेल्या असतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येऊ लागतात.
मला आठवतं मी एका प्रसिद्ध उद्योजकाची मुलाखत पाहायला एका नाट्यगृहात गेलो होतो. त्या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या दोन प्रवेशिका मी घेतलेल्या होत्या. त्यापैकी एक माझ्यासाठी तर एक माझ्या मित्रासाठी होती. मी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेआधीच पोहोचलो व माझ्या मित्राची वाट पाहू लागलो. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर काही वेळाने तो कार्यक्रम सुरू झाला. त्या कार्यक्रमाला दिग्गज उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला होता. माझ्या शेजारची खुर्ची मित्र वेळेवर न आल्याने रिकामीच होती.
काही वेळाने माझ्यापेक्षा वयाने लहान असा एक मुलगा माझ्यापाशी आला. आणि मला नम्रपणे म्हणाला, दादा मला या कार्यक्रमाची प्रवेशिका मिळाली नाही. तरी जर इथे कोणी बसणार नसेल तर मी या खुर्चीवर बसू शकतो का? मी त्याला बोललो, बसायला काहीच हरकत नाही; परंतु ही जागा माझ्या मित्रासाठी आधीच बुक केलेली आहे. आणि तो जर अचानक उशिरा आल्यास पंचाईत होईल. तो पुन्हा विनंतीपूर्वक बोलला, दादा ते आले तर मी उठून जाईन आणि मागे उभा राहीन. प्लिज. त्याचे ते कळकळीचे नम्र आवाहन पाहता मला नकार देता आला नाही आणि मला मनापासून धन्यवाद देत तो माझ्याशेजारी बसला. अतिशय लक्षपूर्वक तो ती मुलाखत पाहात होता. कार्यक्रम अखेरच्या टप्प्यात आला होता. तेवढ्यात माझा तो मित्र तिथे आला. आता मी शेजारच्या त्या मुलाला सांगणार तोच त्याने समजून घेत ताडकन उठला आणि मला म्हणाला, दादा धन्यवाद आता मी येतो, असेही आता कार्यक्रम जवळपास संपला आहे आणि मला जे हवे ते मला मिळाले आहे. जाताना त्याने माझा मोबाइल नंबर घेतला.
मित्राला मी उशिरा येण्याबद्दल विचारले तेव्हा तो अगदी सहज म्हणाला, अरे मित्रांबरोबर सिनेमाला गेलो होतो त्यामुळे उशीर झाला. मी त्याला समजावत बोललो, पण मित्रा त्या सिनेमापायी तू इतका सुंदर कार्यक्रम मिस केलास. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर कसलेही पश्चातापाचे भाव नव्हते. तो अगदी सहज बोलला, असाही मला या कार्यक्रमात रस नव्हता मला तर या कार्यक्रमासाठी आलेल्या त्या सिनेअभिनेत्रीसोबत फोटो काढायचा आहे. मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. तो पुन्हा बोलला, त्या अभिनेत्रीबरोबर फोटो काढून फेसबुकवर टाकला की हजार लाइक्स नक्कीच मिळणार. मी त्यावेळी त्याचे बोलणे ऐकण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हतो.
आज त्या घटनेला जवळपास पाच सात वर्षे उलटून गेली. त्यावेळी मला भेटलेला तो मुलगा म्हणजेच किरण नंतर माझा मित्र झाला. दिवाळीत मी त्याला भेटलो. एक्स्पोर्ट इम्पोर्टच्या व्यवसायात त्याने कमालीची प्रगती केली. इतक्या वर्षांनी भेटल्यावरही त्याने पुन्हा आभार मानले आणि त्यानंतर त्या कार्यक्रमानंतर एका उद्योजकाला भेटून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय वाढविल्याचेही त्याने संगितले. मला त्या मित्राची आठवण आली. तो आजही एका खासगी कंपनीत एका छोट्या पदावर काम करीत होता. या दोघात एकच फरक होता. तो मित्र फोटोसाठी जगला त्यामुळे फोटोशिवाय त्याला काहीही मिळाले नाही. परंतु किरण मोटो (ध्येय, उद्दिष्ट) साठी जगत होता. आज परिणाम समोर होते.
सागर ननावरे