नगर -नगर शहराच्या आसपासच्या गावांत हिंस्र बिबट्या पोचलाय. तो कधीही नगर शहराच्या उपनगरांत प्रवेश करु शकतो. त्याच्या वास्तव्याचा नगरच्या विशेषत: उपनगरांतील नागरीकांनी धसका घेतला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी भरताना नागरीक दहशतीखाली आहेत. सबब, पाणी वितरणाच्या वेळांत तातडीने बदल करावेत, अशी मागणी माजी नगरसेवक जयंत येलूलकर यांनी केली.
या संदर्भात येलूलकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगर शहराच्या आजुबाजुला असलेल्या ग्रामीण भागात अनेक जनावरे, लहान मुले-महिला व ज्येष्ठ नागरीक बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडू शकतात. जनावरे बळी पडलेली आहेतच. नगरमध्ये पोचण्याचे अंतर आता खूप कमी आहे. त्यामुळे पुढील बळी नगर शहरातील असू शकतो. परिणामी हा निर्णय तातडीने घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चांदबिबी महालावर तीन ते चार बिबटे नागरिकांच्या नजरेस पडले आहेत.
त्याचे व्हिडिओ चित्रणही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वन खात्याने देखील तेथे जाण्यास प्रतिबंध केला आहे. शहरवासियांच्या दृष्टिने ही चिंताजनक बाब आहे. बिबटे भक्षाच्या शोधात आपल्या शहरात येऊ शकतात. त्यातून गंभीर घटनाही घडू शकतात. शहराच्या आसपास असलेली उपनगरे अतिशय विरळ आहेत. अगदी महामार्गाजवळ वसलेली आहेत. त्यात भल्या पहाटे अंधार असताना शहराच्या विविध भागात पाणी सोडले जाते. महिला वर्ग मोठया प्रमाणात पाणी भरायला उपस्थित असतो. त्यामुळे संभाव्य संकट टळण्यासाठी हा निर्णय घ्यावा, अशी सूचना येलूलकर यांनी आयुक्तांना केली आहे.