पिंपरी (प्रतिनिधी) – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केली नाही. मात्र शिवसेनेला आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
चिंचवड येथील पुनरूथ्थान समरसता गुरुकुलमला बुधवारी (दि. 10) भेट दिली. यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा पुणेरी पगडी, विठ्ठल मूती, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, अमित शहा हे खर बोलले ते शिवसेनेला फार झोमले. त्यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषाच केली नाही. ते म्हणाले की गेल्या 15 महिन्यात सरकारचा जो व्यवहार सुरू आहे, तो आम्ही पाच वर्ष राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली असती आणि ही वस्तुस्थितीही आहे. आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही.
शहा यांनी सरकारला सल्ला किंवा आवाहन केले की, सरकार-सरकार आहे. त्यामुळे असे जुने हिशोब काढून बसणे योग्य नाही. याबाबत प्रतिक्रिया देताना “शिवसेनेला आजपर्यंत कोणी संपविले नाही.’ असे वक्तव्य शिवसेनेने केले. यामुळे शिवसेना आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. अमित शहा किंवा भाजप शिवसेनेच्या अस म्हणण्याला घाबरत नाही. आम्हाला जे म्हणायचे आहे ते आम्ही छातीठोकपणे म्हणतो. समोरच्याला टाकून बोलणे, अशी भाजपची संस्कृती नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचे भांडवल करण्याचे काही कारण नाही.
अमित शहा यांच्या पायगुणाने सरकार पडेल,’ असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले होते. मात्र भाजपचे वैभववाडीतील काही नगरसेवक शिवसेनेत चालले असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले, तिकडे सर्व 17 नगरसेवक भाजपचे आहेत. त्यापैकी सहाजण गेले आहेत. जाणे-येणे सुरूच असते. त्यामुळे अमित शहा यांच्या पायगुणांमुळे महाराष्ट्रात सरकार येईल आणि वैभववाडीतील सहा नगरसेवक जाणे यांचा काही संबंध नाही. जर त्यांच्या पायगुणामुळे सरकार यायचे असेल तर ते येईल. वैभववाडीचे नगरसेवक गेल्यामुळे ते येणार नाही, असे नाही. भाजपचे सरकार कधी येईल हे सांगायला मी भविष्यकार नाही. मी सामान्य गिरणी कामगारांचा मुलगा आहे, असे म्हणत त्यांनी याबाबत अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.