नवी दिल्ली – वापरातून काढून टाकण्यात आलेल्या विराट या भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकेच्या तोडण्याचे काम सध्या सुरू आहे पण या कामाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तथापि आत्तापर्यंत ही नौका तोडण्याचे काम 30 टक्के पुर्ण झाले आहे.
ही नौका चक्क भंगारात काढण्यात आली आहे. ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी तिचे रक्षण करून तिच्यावर युद्धसंग्रहालय उभारण्यात यावे अशी मागणी करीत एन्व्हीटेक मरीन कन्सल्टन्ट कंपनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे.
त्यावर कोर्टाने सरकारला आणि ही नौका भंगारात विकत घेणाऱ्या कंपनीला नोटीसा जारी करून त्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. तो पर्यंत ही नौका तोडण्याचे काम थांबवण्यात यावे अशी सुचना कोर्टाने केली आहे.
गुजरात मधल्या श्रीराम उद्योग समुहाने ही नौका विकत घेतली असून त्यांनी ती तोडण्याचे कामही सुरू केले आहे. आत्तापर्यंत 30 टक्के काम झाले आहे. आता केवळ 70 टक्के जहाज तोडायचे बाकी आहे. विराट जहाज भंगारात विकण्यासाठी गेल्या वर्षी जुलै महिन्यात लिलाव पुकारण्यात आला होता त्यात या कंपनीने 38 कोटी 54 लाखांना हे जहाज विकत घेतले आहे.
डिसेंबर महिन्यापासून कंपनीच्या एका प्लॉट मध्ये हे जहाज तोडण्याचे काम सुरू असून पुढील आठ ते नऊ महिन्यात आम्ही हे काम पुर्ण करणार होतो असे या कंपनीच्या सूत्रांनी म्हटले आहे. ही युद्धनौका सुमारे 29 वर्ष भारतीय नौदलाच्या सेवेत होती.
सन 2017 मध्ये या नौकेला निवृत्त करण्यात आले. भारत सरकारने नौदलाशी चर्चा करून हे जहाज भंगारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि हे जहाज वाचवण्यासाठी अनेक नागरीकांनी सोशल मिडीयावर मोठी मोहीम चालवली होती.