Chandrakant Patil : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांना चष्मा लागल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र हे करताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यावर आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीत पंकजा मुंडे यांच्या व्हिडीओविषयी बोलताना,”पंकजाताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते, त्या हसल्या तरी बातमी होते. कधी गंभीर झाल्या की बातमी होते. त्यामुळे त्यांचं दुर्दैव की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे तुम्ही त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं आहे”, असे चंद्रकांत पाटील
म्हणत या विषयावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवरही यावेळी हल्लाबोल केला. “संजय राऊत यांना त्यांच्या पक्षात कोणीही सीरियस घेत नाही. राज्यातही कोणी सीरियस घेत नाही. केवळ तुम्ही रोज भरपूर दाखवता म्हणून रोज उत्साहाने बोलण्याचं धाडस ते करतात”, अशी खोचक टीकादेखील त्यांनी केली.
जायकवाडी धरणातील पाण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांनी कालच सांगितले की मराठवाड्याला त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळेल,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.