नवी दिल्ली – चंदिगडच्या विमानतळाचे नामकरण शहिद भगतसिंग यांच्या नावाने केले जाणार असल्याची घोषणा पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी आज “मन की बात’ या रेडिओवरील आपल्या मासिक वार्तालापाच्या कार्यक्रमादरम्यान केली. यावेळी पंतप्रधानांनी विविध विषयांवरील आपली मते व्यक्त केली. त्यामध्ये सागरी परिसंस्थेला असलेला धोका आणि समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. या आव्हानांबाबत उपाय योजना करणे ही आपली जबाबदारी असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधानांनी भाजपचे विचारवंत पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजलीही वाहिली. पंडीत उपाध्याय ज्येष्ठ विचारवंत आणि द्रष्टे होते. त्यांचा एकात्म मानवतावाद आजही आपल्याला मार्गदर्शक असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात चित्ते आल्याबद्दल देशवासियांना प्रचंड अभिमान वाटतो आहे. हे चित्ते भारतातील पर्यावरणाला अनुकूल होत असल्याचे निरीक्षण एक टास्क फोर्स करत आहेत. या चित्त्यांच्या नामकरणाबाबत एक स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
शहिद भगत सिंग यांच्या जयंतीपूर्वी चंदिगड विमानतळाचे नामकरण शहिद भगतसिंग यांच्या नावावरून करण्यात येणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. देशवासियांना स्वातंत्र्यसैनिकांपासून प्रेरणा मिळावी यासाठी काही दिवासंपूर्वी कर्तव्यपथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
28 सप्टेंबरला “सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला होता, याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली. मूकबधिरांसाठीच्या सांकेतिक भाषेत नव्याने 10 हजार शब्द समाविष्ट केल्याची माहितीही त्यांनी दिली. आगामी सण आणि उत्सवाच्या काळात खादी, हस्तकला आणि देशांतर्गत उत्पादनांच्या भेटवस्तू आपल्या परिजनांना देण्यात याव्यात आणि प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करावा, असे आवाहनही पंतप्रदानांनी देशवासियांना केले.