नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’च्या ९३ व्या भागात देशवासीयांना संबोधित केले. यावेळी मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचाही उल्लेख करत मोठी घोषणा देखील केली. पंतप्रधानांनी यावेळी देशातील एक महत्त्वाच्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाणार असल्याची घोषणा केली. तसेच आजच्या मन कि बातमध्ये योग, खेळ, शिक्षण, भारतातील विविधता, पर्यटन, पर्यावरण अशा विषयांवर भाष्य केले.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये २८ सप्टेंबर हा विशेष दिवस आहे. या दिवशी आपण थोर देशभक्त शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करू. भगतसिंग यांच्या जयंतीच्या अगोदर भारत सरकारने त्यांना श्रद्धांजली म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चंदीगड विमानतळाचे नाव बदलून या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी योगविद्येवर भाष्य केले. शारीरिक आणि मानकसिक स्वास्थ्यासाठी योगा खूप महत्त्वाचे आहे, हे संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. मधुमेह आणि रक्तदाबाच्या अडचणींवर मात करण्यासाठी योग खूप फायदेशीर ठरतो. योगाचे हेच महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्राने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे, असे मोदी म्हणाले.
आपल्या देशात सध्या उत्सवांचे पर्व आहे. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या नऊ दिवसांत आपण उपवास करतो तसेच काही नियम पाळतो. नवरात्रीनंतर विजयादशमी साजरी केली जाईल. या सणांमध्ये भक्तीभाव आध्यात्मिकतेसोबतच अनेक संदेश असतात, असेही मोदी म्हणाले.