पिंपरी, (प्रतिनिधी) – मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्यांक विलास महासंघाच्या वतीने अध्यक्ष रफिक कुरेशी यांच्या नैतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी महासंघाच्या वतीने हवेली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे, असे स्पष्ट मत जस्टीस राजेंद्र सच्चर आयोग, रंगनाथ मिश्रा आयोग व नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या कमिटीने मांडले होते. काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने 2014 साली मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. मात्र सध्याच्या सरकारने याविरोधात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याविरोधात हे साखळी उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला अखिल मातंग समाजाने पाठिंबा दिला आहे. तर याउपोषणामध्ये रफिक कुरेशी, साजेद शेख, नरेंद्र पवार, रिपब्लिकन पार्टी आोफ इंडियाचे आनंद धेंडे, रेहमान शेख, राहूल पवार, एस. जे. वाळके, मोहसीन शाह, अश्पाक शेख, राजेश नागोसे, भागवत कांबळे, प्रविण कांबळे, ज्ञानेश्वर बोराटे आदींनी सहभागी होत पाठिंबा दर्शविला.