जुलै पासूनची थकबाकी मिळणार
नवी दिल्ली- केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई भत्त्यात पाच टक्के इतकी वाढ केली आहे. तो प्रस्ताव आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. या निर्णयाचा लाभ 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे 65 लाख निवृत्तीवेतनधारकांनाहीं होणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 15 हजार 909 कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची माहिती दिली.
ते म्हणाले की केंद्र सरकारने कर्मचाऱ्यासाठी दिलेली ही दिवाळी भेट आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून 17 टक्के इतका झाला आहे. एकाच टप्प्यात पाच टक्के इतकी मोठी वाढ प्रथमच होत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू धरण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महागाई भत्त्यातील वाढीच्या संबंधातील निर्णय प्रलंबीत होता. आता निवडणुका आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक खूष खबर ठरली आहे. सातव्या वेतन आयोगातील मान्य करण्यात आलेल्या शिफारशींच्या फॉर्म्युल्यानुसारच ही वाढ जाहीर करण्यात आली आहे.