राम जन्मभूमी पूजनानिमित्त धार्मिक कार्यक्रम
हिंजवडी – अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन होत असल्याच्या आनंदात भंगारमालाच्या व्यवसायातील उद्योजक असलेल्या बाळू मावशी धुमाळ त्यांच्या माण-हिंजवडी-गवारवाडी खिंडीतील राम मंदिरात बुधवारी (दि. 5) दुपारी एक वाजता खिरापत वाटणार आहे. वारकरी सांप्रदायातील बाळू मावशींनी यावर्षी 26 फेब्रुवारी रोजी राम मंदिर उभारून तेथे राम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती.
अशिक्षित असूनही श्रद्धेपोटी त्यांनी व्यवसायातून जमवलेली पुंजी खर्च करून हे मंदिर बांधले. याशिवाय साधू संताना बोलावून प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम केला होता. या मंदिरासाठी जयपूरवरून मूर्ती आणण्यात आल्या होत्या. करवीर पिठाच्या शंकराचार्यांनी या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती.
अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन होत असल्याने हा आनंद व्यक्त करण्यासाठी त्या साखर-खोबऱ्याची खिरापत वाटून परिसरातील भाविकांचे तोंड गोड करणार आहेत. करोनामुळे मंदिर बंद असले तरी साफ सफाई, स्वच्छतेसाठी तेथे जावे लागते. वीज नसली तरी जनरेटर लावून पाण्याची व्यवस्था करावी लागते. एकदा मंदिर उभारले की त्याची काळजी महामारी असली तरी घ्यावी लागते. श्रद्धेने आलेली ती जबाबदारी आहे. त्यात मी कमी पडत नाही. करोना काळातही माझ्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांसाठी काम करीत असते’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सत्तरी ओलांडलेल्या बाळू मावशी यांनी विठ्ठल मंदिर देखील उभारले असून, दर वर्षी तेथे हरिनाम सप्ताह करतात. स्वखर्चाने या परिसरातील दिंडी त्या हरिद्वार, काशीला घेऊन गेल्या आहेत. त्या अयोध्येला सहा वेळा जाऊन आल्या आहेत. राम मंदिर बांधकाम सुरू झाल्यावर परवानगी घेऊन त्या अयोध्येला जाणार आहेत.