मुंबई – बॅंकेच्या ठेवीदारांनी अधिक परताव्याचा पाठलाग करताना सावध राहण्याची गरज असल्याचा सल्ला रिझर्व बॅंकेने ठेवीदारांना दिला आहे. जास्त परताव्याचा दावा करणाऱ्या संस्थामध्ये ठेवी ठेवणे अधिक जोखमीचे असते असे रिझर्व्ह बॅंकेने सूचित केले.
जास्त परतावा किंवा जास्त व्याजदर हे जोखमीशी निगडीत असतात, हे ठेवीदारांनी सदैव ध्यानात ठेवण्याची गरज आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, संतुलित विचार करून गुंतवणूकदारांनी ठेवीचा निर्णय घेण्याची अपेक्षा असते.
रिझर्व बॅंक आपल्यापरीने बॅंकांच्या कामकाजाकडे लक्ष ठेवत असते. मात्र तरीही बॅंकातील व्यवस्थापन, ऑडिटर्स, व्यवस्थापन इत्यादींनी संयुक्तपणे बॅंक व्यवस्थित काम करीत आहे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दास म्हणाले.
आता बॅंकांच्या ठेवीदारांचा पाच लाखापर्यंतच्या ठेवींचा विमा उतरवला जात असला तरी ठेवीदारावर असा प्रसंग येऊ नये याची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी बॅंकांना सांगितले. लॉक डाऊनच्या कालात बॅंकांनी उत्तम कामगिरी करून आपले ताळेबंद सुधारले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.