मुंबई – शेअर बाजार बंद झाल्यानंतर महागाईची आकडेवारी जाहीर होणार होती. दरम्यानच्या काळात वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील रिझर्व बॅंकांची बैठक होणार आहे. त्यामुळे अस्वस्थ गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 503 अंकांनी कोसळून 58,283 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.82 टक्क्यांनी म्हणजे 143 अंकांनी कमी होऊन 17,368 अंकांवर बंद झाला. विक्रीचा जोर इतका जास्त होता की सेन्सेक्ससंबंधातील 30 पैकी 23 कंपन्याच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली.
उर्जा, ग्राहक वस्तू, रिऍल्टी क्षेत्रांचे तब्बल 1.75 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. धातू क्षेत्रातील कंपन्याचे शेअर काही प्रमाणात वाढले. मिड कॅप 0.53 टक्क्यानी कमी झाला तर स्मॉल कॅप 0.24 टक्क्यानी वाढला. जागतीक बाजारातून नकारात्मक संदेश आल्याचाही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला.
एचडीएफसी, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा, नेस्ले, स्टेट बॅंक या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. मात्र या अवस्थेतही ऍक्सिस बॅंक, टेक महिंद्रा, पावर ग्रीड, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
चालू आठवडा अस्थिरतेचा
ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढल्यामुळे युरोपीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. ओमायक्रॉन वेगात पसरतो की काय अशी शंका गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली. अमेरिकेतील महागाई वाढली असतानाच फेडरल रिझर्वची बैठक होणार आहे. युरोपियन आणि ब्रिटनच्या रिझर्व बॅंकांची बैठक या आठवड्यात होणार आहे. महागाईचा मुकाबला करण्यासाठी या बॅंका कसे पतधोरण जाहीर करतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
डॉलर वधारत असल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्री चालू ठेवल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत आहेत. नोव्हेंबरमध्ये या गुंतवणूकदारांनी 30,799 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर 10 डिसेंबरपर्यंत 17,644 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. यामुळे आगामी काळात शेअर बाजारात अस्थिरता रेंगाळणार असल्याचे विश्लेषकांना वाटते.